'नाशिक टाइम्स'चा फॉरमॅट बदलतोय; जळगाव उपआवृत्तीही लवकरच!

पुणे, नाशिकमधील यशाने जोशात आलेल्या बेनेट-कोलमन व्यवस्थापनाने आपला विस्ताराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा तेज केला आहे. एकीकडे 'डीबी कॉर्प'च्या गोटात पाच आवृत्त्यांनंतर सामसूम झालेली असताना 'मटा'चा वारू उधळला आहे. लवकरच 'नाशिक टाइम्स'चा फॉरमॅट बदलतोय. या फीचर बेस्ड पुरवणीतही आता न्यूज असतील. सध्या कोल्हापूर, नागपूरला तशी पुरवणी आहे. पुरवणीतील तीन पानं न्यूज आणि तीन पानं फिचर असतील. एकदा ही नव्या स्वरूपातील पुरवणी सेट झाली की मग जळगावची उपआवृत्ती काढण्याचा 'मटा' व्यवस्थापनाचा विचार आहे. नाशिकमध्ये बातम्या आणि बिझनेस या दोन्ही पातळीवर टार्गेट पार करून जबरदस्त कामगिरी झाल्याने संपादक अशोक पानवलकर यांच्यासह 'मटा' व्यवस्थापनही ब्युरो चीफ सचिन अहिरराव यांच्यावर खूष आहेत. 

आजच्या घडीला आपल्या लिखाणाने वाचकांना आकर्षित करण्याची ताकद असणारे मोजकेच पत्रकार उत्तर महाराष्ट्रात आहेत. त्यातील 'गांवकरी'चे कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरे यांची 'राजकारणा'वर जबरदस्त पकड आहे. मात्र, क्षमता असूनही ते नाशिकबाहेर डोकवायला तयार नाहीत. त्यांनी आपले वर्तुळ विस्तारण्याची गरज आहे. दुसरे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल ते सचिन अहिरराव यांचे. नाशिकमध्ये बसून ते ज्या ताकदीने जळगाव-धुळ्यातील विषय हाताळतात, त्याला तोड नाही. खानदेशातील स्थानिक संपादकांनाही कधी त्या ताकदीने लिहिता आले नाही किंवा त्यांच्या लेखणीत तो दमच नाही. नाही म्हणायला श्रीमंत माने यांनी खानदेश समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला. खानदेशात कुणालाही भिडण्याची ताकद असणारा 'सकाळ'च्या मुशीतील पत्रकार आहे, सुरेश उज्जैन्नवल; पण त्यांची फार नसबंदी केली गेलीय (म्हणजे लिखाणालाच बंदी!). हे मोजकी दोन-तीन नावे सोडली तर उत्तर महाराष्ट्रात चटकन एखादं ताकदीचं नावच समोर येत नाही. किरण अग्रवाल यांच्या सदराचे नाव तर 'सारांश' आहे पण त्यात साराच फाफटपसारा विस्ताराने असतो. बरे एव्हढे दम लागेस्तोवर वाचले तरी लेखकाला नेमके काय म्हणायचेय त्याचा 'किरण'च वाचकाच्या डोक्यात पडत नाही. हेमंतराव लिहितात भन्नाट; पण ते समजायला त्या ताकदीचं डोकं हवं. 'ऍग्रोवन'मध्ये असताना शैलेंद्र चव्हाण यांनी कृषी विषयांवर विपुल लिखाण केले. अनेक सरकारी त्यांचा सल्ला घेतात. मात्र 'आधुनिक किसान'मध्ये गेल्यापासून त्यांचे लिखाण काही कुणाला कळत नाही. याशिवाय 'देशदूत'मध्ये सुरेश अवधून पुन्हा परतले आहेत. कुणी काहीही म्हणो त्यांची 'भरारी' अनेकांना भावते. बहुतेक सारडांकडचे लग्नकार्य आटोपले की नंदकुमार टेणी यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. नाशकात ते गेले की जळगावात पाठविलेल्यांना पुन्हा नाशकात हलविले जाईल, अशी चिन्हे आहेत. कारण वर्धापनदिनी गाडी आली नाही म्हणून जे काही गैरहजेरी नाट्य घडलेय, ते काही जनकभाउना रुचलेले नाही. एकीकडे 'देशदूत'मध्ये संपादकांची गोची झाली असताना 'सकाळ'ला जळगावात संपादक मिळत नाहीये. 'बेरक्या'ला मिळालेल्या माहितीनुसार, 'सकाळ'कडे अवघे तीन अर्ज आले आहेत. त्यातील एक मुळच्या खानदेशातील व सध्या मराठवाड्यात काम करीत असलेल्या वृत्तसंपादकाचा आहे. दुसरा सारडांकडे अडगळीत पडलेल्या जुन्या 'सकालाईट'चा तर तिसरा संस्थेंतर्गत 'सरदारा'चा आहे. बघूया कोणाला लॉटरी लागते ते..