बाबूजींच्या मानबिंदूमध्ये भाऊची मनमानी

बीडमध्ये भूकंप, गळतीही वाढली !
औरंगाबाद - बाबूजींच्या मानबिंदूमध्ये भाऊ आणि  त्यांनी ठेवलेल्या दिवाणची मनमानी वाढली आहे.  मानबिंदूत सुधारणा करण्याऐवजी  कर्मचाऱ्याविरुद्ध  मालकांकडे कान  भरणे आणि सुडाचे राजकारण करणे इतकेच या दोघांना जमत असल्यामुळे मानबिंदूची वाट लागत आहे. बाबुजीही या दोघांवर अंध विश्वास ठेवत असल्यामुळे कर्मचाऱ्याची गळती वाढली आहे.
भाऊ आणि त्यांनी ठेवलेल्या दिवाणच्या मनमानी आणि  छळास  कंटाळून बीडचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नलावडे आणि अन्य तीन रिपोर्टरनी बंड करत सात  महिन्यापूर्वी एकाच वेळी राजीनामे दिले होते, हे राजीनामे पाहून भाऊंची बोबडी वळाली होती. याप्रकरणी बाबूजीनी  कान उघडण्याअगोदरच भाऊंनी बीड गाठले आणि सर्वांची मनधरणी  करून दिवाणावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि वेळ मारून नेली. ती सल भाऊंच्या मनात सात महिन्यापासून सलत होती. जे जिल्हा प्रतिनिधी बंड करत होते, त्याना थंड करण्यासाठी बदल्याची नामी शक्कल भाऊंनी लढवली. त्यानुसार परवा दत्ता थोरे यांची बीडला बदली करण्यात आली.मात्र  थोरेंनी बीडला जाण्यास नकार देताच त्यांना औरंगाबादमध्ये हलविण्यात आले. थोरेना आता प्रिंट ऐवजी ऑनलाईनमध्ये काम देण्यात येणार असल्याचे कळते.थोरेंना सोलापूर हवे होते, पण आजपर्यंत त्यांची बोळवण करण्यात आली. यामुळे थोरे नाराज असून ते लवकरच मानबिंदूतून बाहेर पडतील, अशी चिन्हे आहेत.
थोरेंनी बीडमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळं सारेच गणित बिघडले. बीडला सतीश जोशी यांना पाठवण्यात आले. त्यानंतर मागील वचपा काढण्यासाठी बीडचे यापूर्वीचे  जिल्हा प्रतिनिधी प्रताप नलावडे यांना नारळ देण्यासाठी भाऊंनी पूर्णपणे तयारी केली होती. एकंदरीत रागरंग  पाहून नलावडे यांनी गुरुवारी औरंगाबाद गाठून  स्वतःहून राजीनामा दिला. इकडे जोशी बीडला जॉईन होताच बंड करणाऱ्या संजय तिपाले, व्यंकटेश वैष्णव व राजेश खराडे या रिपोर्टर्नीही राजीनामे दिले. बीडचा सर्व संपादकीय विभाग एकाच वेळी बाहेर पडल्यामुळं मानबिंदूमध्ये मोठा भूकंप झाला आहे.
भाऊंनी नलावडेचा राजीनामा घेतला, थोरेंचा सुंता केला आणि उस्मानाबादच्या विशाल सोनटक्के यास लातूरला बदली करून दुय्यम स्थान दिले. आता जालन्याचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भिसे भाऊच्या निशाण्यावर असून त्यांचा गेम करण्याची फिल्डींग लावण्यात सध्या भाऊ व दिवाण व्यस्त आहेत. भाऊंच्या मनमानीमुळे यापूर्वी विनोद काकडे, गणेश खेडकर, यांच्यासह दहाजण आधीच बाहेर पडले आहेत.
भाऊंची डबल ढोलकी
जेव्हा सात महिन्यापूर्वी बीडच्या सर्व संपादकीय विभागाने राजीनामे दिले होते, तेव्हा भाऊ तातडीने  बीडला येवून दिवाणला बाजूला करण्याचं आश्वासन दिले होते. मालकाच्या नावानेही खडे फोडले होते, तेच भाऊ वेळ जाताच कर्मचाऱ्यावर उलटले.
दिवाळी अंकाच्या बैठकीत बोलताना भाऊ जाहीरपणे जोमाने कामाला लागा, असा बिझनेस करा तसा करा, असे सांगतात आणि बैठक संपली की संपादकीय सहकाऱ्याना म्हणतात, मी सांगितल्याशिवाय काहीही करू नका, मालक फक्त धंदा धंदा करतो, आपण काय तेच करायचे का, अशी मुक्ताफळे उधळतात. भाऊंच्या डबल ढोलकीची ऑडीयो   क्लिपच बेरक्याच्या हाती लागली आहे.
सोलापूर, जळगावात ही भाऊने कर्मचाऱ्यांना कसे छळले. तेथील भाऊच्या उद्योगाचे अनेक किस्से बेरक्याला मेलवर अनेकांनी पाठविले आहेत.
भाऊ आणि त्यांनी ठेवलेल्या दिवाणचे कारनामे बाबूजींना माहित असूनही बाबूजी गप्प  असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बाबूजींना कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रारी करणारा संपादकच हवा आहे का ? असे असेल तर मानबिंदूची वाटचाल अंधाराकडे असेल हे मात्र नक्की ...