दै. भास्करचे समूह संपादक याग्निक आत्महत्या प्रकरणी मुंबईच्या महिला पत्रकारावर गुन्हा दाखल

इंदौर – दैनिक भास्करचे  समूह संपादक आणि वरिष्ठ पत्रकार कल्पेश याग्निक यांना खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिला पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्पेश याग्निक यांनी इंदौर येथील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली होती. हृदयविकाराच्या झटक्‍याने कल्पेश याग्निक यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते, मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. कल्पेश याग्निक यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मुंबईतील एका महिला पत्रकाराविरोधात आयपीसी कलम 306, 386 आणि आयटी ऍक्‍ट 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सलोनी अरोरा असे या महिला पत्रकराचे नाव आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ही महिला पत्रकार कल्पेश याग्निक यांना फोन करुन छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. धमकीच्या आधारे या महिलेने याग्निक यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती.
ही पत्रकार महिला अनेक दिवसांपासून कल्पेश यांना ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करायची, असा आरोप कल्पेश यांचे भाऊ नीरज याग्निक यांनी केला आहे. नीरज यांनी 3 जुलै रोजी अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.