पुणे 'स्मार्ट सिटी' साठी 'सकाळ'चे दोन कोटी रुपयांचे योगदान

 विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता महाराष्ट्रात दुसरे मोठे शहर होत आहे.मुंबईनंतर सर्वात मोठे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते.हेच पुणे आता 'स्मार्ट सिटी' करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलाय.त्यात योगदान म्हणून सकाळने दोन कोटी रूपये मदत जाहीर केली आहे.
'पुणे आणि सकाळ' हे जणू समीकरण झाले आहे.पुण्याच्या वाचकांना फक्त हवा असतो सकाळ... नंबर 1 असलेल्या सकाळने सामाजिक आणि विकासाच्या कार्यात नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.
स्मार्ट पुणे सिटीसाठी स्मार्ट सकाळने जी दोन कोटी मदत जाहीर केली आहे,त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे...
सामाजिक आणि विकासात्मक कामाबद्दल सकाळ परिवाराचे बेरक्याकडून खास अभिनंदन...सकाळच्या अश्या कार्याला बेरक्याचा नेहमीच सक्रीय पाठींबा राहिल,कारण आम्हाला हवी आहे,स्मार्ट पुणे सिटी...

केंद्राच्या "स्मार्ट सिटी‘ स्पर्धेत "पुणे नंबर वन‘स्थानी यावे म्हणून "सकाळ‘ आणि "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन‘ने (डीसीएफ) पुणे महापालिकेच्या सहकार्याने उघडलेल्या मोहिमेत "सकाळ माध्यम समूहा‘ने दोन कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले आहे. त्यातून तनिष्का सदस्यांना स्मार्ट फोन देण्यात येणार असून, त्याद्वारे स्मार्ट सिटीसाठी सर्व पुणेकरांपर्यंत पोचणारे सशक्त नेटवर्क कार्यरत होईल.

वेगवेगळ्या क्षेत्रांत नवे मानदंड प्रस्थापित करताना, विविध आदर्श निर्माण करणाऱ्या आणि समाजासाठी पथदर्शी काम करणाऱ्या पुण्याने स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत मागे राहू नये, या भूमिकेतून "पुणे नंबर 1‘ या उपक्रमास सुरवात झाली आहे. त्यात पुणेकर उत्साहाने सहभागी होत आहेत. पुण्याने ऐतिहासिक कामगिरी करताना देशपातळीवर नेतृत्व केले आहे; आता या क्षेत्रातही पुणेकरांनी देशासमोर आदर्श निर्माण करावा. स्मार्ट सिटीचे जे निकष आहेत, त्याबाबत देशपातळीवर अव्वल ठरेल, अशी कामगिरी करावी आणि पुण्याला "नंबर वन‘ स्थानी ठेवावे, या हेतूनेच "सकाळ माध्यम समूह‘ सक्रियपणे सहभागी झाला आहे.
"स्मार्ट सिटी‘ नव्या नागरीकरणाची अपरिहार्य गरज आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे तो लोकसहभागाचा. प्रत्येक पुणेकराचे मत किंवा अभिप्राय त्यात नोंदविला जाणे आवश्‍यक आहे. त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे नव्या संपर्क तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. म्हणूनच "डीसीएफ‘ने स्मार्ट फोनचे माध्यम वापरण्याचे ठरवले. प्रत्येक बूथमागे एक अशा प्रकारे तनिष्का सदस्याला स्मार्ट फोन देणे आणि त्या सदस्याने आपल्या भागातील अडीचशे कुटुंबांच्या संपर्कात राहणे, अशी पद्धत स्वीकारली आहे. ज्यामुळे संपूर्ण पुणे शहराशी संपर्क प्रस्थापित होईल आणि स्मार्ट सिटीचा मूळ आधार असलेला लोकसहभाग शक्‍य होईल. तनिष्का सदस्यांना देण्यात येणारे फोन केवळ स्मार्ट फोन नाहीत, तर त्यात "पर्सिस्टंट‘च्या सहकार्याने उच्च क्षमतेचे सॉफ्टवेअर लोड केले आहे. पत्रकारितेच्या इतिहासात हा अभिनव असा प्रयोग आहे. तो सर्वांनी मिळून यशस्वी करायचा आहे. "बस डे‘ हा उपक्रम जशी लोकचळवळ बनला; त्याप्रमाणेच "पुणे नंबर 1‘ हादेखील लोकांचा उपक्रम झाल्यास पुण्याला स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत अव्वल स्थानी येण्यास कोणी रोखू शकणार नाही.
लोकजीवन अधिक सुकर करण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटीची संकल्पना पुढे आली. भारतात 2019 पर्यंत शंभर शहरे "स्मार्ट‘ करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याचा पहिला टप्पा 20 शहरांच्या समावेशाने सुरू होत आहे. त्यासाठी 98 शहरांची नावे जाहीर करण्यात आली; त्यात महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश आहे. आता स्पर्धा आहे पहिल्या वीसमध्ये कोणती शहरे येतात याची; त्यासाठी सर्व शहरांनी कंबर कसली आहे.
मदतीचा हात हवा!
"सकाळ‘ने या उपक्रमाची सुरवात करून त्यासाठी दोन कोटी रुपयांचे भरीव योगदान दिले आहे. आता या कामी लोकांनीही पुढे येण्याची गरज आहे. हे काम खूप व्यापक आहे. त्याची सुरवात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी झाली. या कामासाठी मोठा निधी लागणार आहे. पुणेकरांनी यासाठी जेवढी शक्‍य होईल तेवढी मदत करावी आणि पुण्याचे नाव अव्वलस्थानी ठेवण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन "डीसीएफ‘च्या वतीने करण्यात येत आहे. आपली मदत "सकाळ सोशल फाउंडेशन‘च्या नावे द्यावी, प्राप्तिकर कलम 80 जी नुसार ही रक्कम कर सवलतीस पात्र आहे. जास्तीत लोक, संस्था, उद्योग, व्यावसायिक, संघटना, गणेश मंडळे आदींनी सढळ हस्ते मदत करावी, अशी अपेक्षा आहे.