‘सार्वमत’मध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा!

अनंत पाटलांना संपादनाऐवजी वसुलीसाठीच घाम गाळावा लागणार

अहमदनगर : सार्वमतमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस येत चालला आहे. अंक वितरण व जाहिरातीपोटी वसुली झालेला पैसा कंपनीकडे जमा झालाच नसून, आता जेव्हा जाहिरात व्यवस्थापक रवींद्र देशपांडे व वितरण व्यवस्थापक कांतिलाल पुरोहित हे बाहेर पडले आहेत, तेव्हा अनेक अंक वितरक व वार्ताहर आपल्याकडील पैसे भरल्याच्या पावत्याच त्यांना दाखवत आहेत. त्यामुळे पैसे घेतले गेले ते गेले कुठे? हा प्रश्‍न पडला आहे. अनेक वार्ताहर व वितरकांनी आपल्याकडील बिले ही हातोहात दिली होती. त्यांच्याकडे पावत्याही नाहीत. त्यांना मात्र आता वसुलीचा तगादा असह्य झाला आहे. मोठ्या प्रमाणात थकीत झालेली रक्कम अन् सारडाशेठने नाशिकवरून पैसे पाठविण्यास दिलेला नकार पाहाता, सार्वमत मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. वार्ताहर, जाहिरातदार अन् वितरक यांना कायदेशीर नोटिसी पाठवू, अशा धमक्या दिल्या जात असल्याने ग्रामीण पातळीवर काम करत असलेला वार्ताहर सद्या धास्तावलेला आहे. हा आर्थिक घोटाळा काही कोटींच्या घरात असण्याचा प्राथमिक अंदाज असून, पैसे वसुलीसाठी देशपांडे-पुरोहित या जोडगोळीवर दबाव आणला आहे. त्यांच्या जोडीला आता नवे संपादक अनंत पाटील हेदेखील येत आहेत. अनंत पाटील यांच्याकडे संपादकपद देण्यामागे सारडाशेठचे आर्थिक वसुलीचे गणित कारणीभूत असून, त्यामुळेच त्यांनी काही लाखाच्या घरातील पॅकेज देऊन लोकमतमधून फोडले. बड्या जाहिरातदारांकडे अडकलेला पैसा पाटील काढून देतील, असा सारडाशेठचा विश्‍वास आहे.