औरंगाबादमध्ये एकमतचे रिलाँचिंग तर पुढारीमुळे स्पर्धा वाढणार

औरंगाबाद /लातूर -जनतेवर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणारे लोकनेते विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर लातूरकरांबरोबर दैनिक एकमत पोरका झाला आहे.ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस यांनी विलासरावांच्या निधनानंतर एकमतचे संपादकपद सोडल्यानंतर कुचकामी पांडुरंग कोळगे यांना संपादकपद देण्यात आले होते,त्यामुळे एकमतची अधोगती सुरू झाली.मराठवाड्यातील अनेक जिल्हा कार्यालये बंद करण्यात आली.आता एकमत लातूरपुरताच सिमीत राहणार की काय,असे वाटत असतानाच अमित देशमुख यांनी कोळगे यांची हकालपट्टी करून मंगेश देशपांडे - डोंग्रजकर यांच्यावर धुरा सोपवली.डोंग्रजकर यांनाही एकमतचा भार पेलवत नसल्याचे दिसून येत आहे.अंकात कसलाही बदल झालेला दिसत नाही किंवा खपात होणारी घसरण सुरूच आहे.
दुसरीकडे पुण्यनगरीतून बाहेर पडलेली जोडगोळी आर.टी.कुलकर्णी आणि सुशिल कुलकर्णी एकमतमध्ये प्रवेश करताच डोंग्रजकर अस्वस्थ झाले.आपल्या संपादकपदावर गंडातर येणार की काय असे त्यांना वाटल्याने त्यांनी पुढारीत जाण्याचा निर्णय घेतला होता,परंतु तो निर्णय सध्या तरी फिरवल्याचे दिसत आहे.डोंग्रजकर यांनी लातूरचा तर सुशिल कुलकर्णी यांनी औरंगाबाद आवृत्तीचा डोलारा संभाळण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
दैनिक एकमतची औरंगाबाद आवृत्ती रिलॉचिंग करण्याचा धााडसी निर्णय अमित देशमुख यांनी घेतला आहे.त्यासाठी बीडच्या ताई सुशिलच्या मदतीला आल्याचे कळते.
दैनिक एकमतचे औरंगाबादला प्रिंटींग युनिट नाही.छपाई लातूरला करणार की औरंगाबादला याबाबत अजून तरी निर्णय झालेला नाही.औरंगाबादला अंकाचे प्रिंटींग करायचे म्हटल्यास खर्च वाढणार आहे.

औरंगाबादमध्ये स्पर्धा वाढणार
औरंगाबादला बंद पडलेला गावकरी जून महिन्यात सुरू झाला.येत्या काही दिवसांत पुढारी सुरू होणार आहे. दोन महिन्यात एकमतही सुरू होणार आहे.पुढारीचे औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लागले आहेत.दैनिक पुढारी आता मराठवाड्यात भारी,अशी जाहिरातबाजी सुरू झाली असली तरी एकंदरीत टीम भारी वाटत नाही.संपादकीय विभागात अजून म्हणावी तशी भरती झालेली दिसत नाही.निवासी संपादक पद अजूनही रिक्तच आहे.सुंदर लटपटे यांच्या नेतृत्वाखाली पुढारी अन्य दैनिकास कितपत टक्कर देणार,हे येत्या काही काळात स्पष्ट होणार आहे.
एकमतची जोडगोळी आर.टी.कुलकर्णी आणि सुशिल कुलकर्णी यांनी एकमत असा राहील तसा राहील म्हणून हवा सोडली आहे.ही हवा टिकण्यासाठी आर्थिक बाजू मजबूत असणे आवश्यक आहे.अमित देशमुख यांनी सध्या दोन कोटी रूपये  औरंगाबाद आवृत्तीच्या रिलाँचिंगसाठी दिल्याचे कळते.त्यानंतर मात्र या जोडगोळीलाच एकमत फायद्यात आणावा लागेल.एकमत यशस्वी करण्यासाठी आर.टी.कुलकर्णी आणि सुशिल कुलकर्णी या जोडगोळीची मोठी कसोटी लागणार आहे.
लोेकमत,सकाळ,दिव्य मराठी,पुण्यनगरी,महाराष्ट्र टाइम्स,सामना,लोकसत्ता,गावकरी नंतर आता पुढारी आणि एकमत सुरू होणार असल्याने औरंगाबादमध्ये मोठी स्पर्धा होणार आहे.सध्या औरंगाबादमध्ये नव्या दैनिकास कसलाही स्पेस नाही.तरीही पुढारी आणि एकमत सुरू होत आहे.पुढारी आणि एकमतमुळे बेरोजगार लोकांना संधी मिळाली आहे.त्याचबरोबर पुढारीत जाणार्‍यास पगार वाढवूून मिळाला आहे,हे वृत्तपत्र कर्मचार्‍यासाठी एकप्रकारे चांगलेच घडले आहे.