वागळे मास्तरांना अल्टीमेटम

मुंबई - 'आता जग बदलेल' चॅनलच्या वागळे मास्तरांचा 'आजचा सवाल' हा डिबेट शो 'लाइव्ह' सुरू असताना,सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांना वागळे मास्तारांनी सर्वासमक्ष हाकलून लावले,त्यानंतर वागळे मास्तर आणि मॅनेजमेंटचे चांगलेच वाजले आहे.वागळे मास्तर आणि मॅनेजमेंटचे गेल्या काही दिवसांपासून 'तू -तू,मै -मै' सुरू होते,त्यात वर्तकांच्या मानापमान नाट्यानंतर त्यात चांगलीच टिण्णगी पडली आहे.चॅनेल आर्थिक डबघाईस आल्यामुळे वागळे मास्तरांचा मूड गेला आहे,त्यामुळे त्यांची चिडचिड सुध्दा अधिक वाढली आहे.
वर्तकांच्या मानापमानानंतर वागळे मास्तर रजा टाकून सुट्टीवर गेले आहेत.केव्हा परत येणार हे सांगायला ते तयार नाहीत.त्यामुळे मॅनेजमेंट आणि वागळे मास्तरांंतील तणाव वाढला आहे.अखेर मॅनेजमेंटने त्यांना 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे.2 नोव्हेंबरपर्यंत कामावर रूजू न झाल्यास वागळे मास्तारांना कायमचा नारळ देण्याची तयारी मॅनेजमेंटने केली आहे.त्यांच्या जागेवर संपादक म्हणून आशिष जाधव यांची निवड करून एका दगडात दोन पक्षी मारण्याची तयारीही मॅनेजमेंटने ठेवली आहे.
दुसरीकडे वागळे मास्तर गेल्यास आपले कसे होईल,या धास्तीने वागळे समर्थक चांगलेच धास्तावले आहेत.वागळेंची विकेट पडल्यास या पंटरना सुध्दा हाकलण्याची तयारी मॅनेजमेंटने केली आहे.त्यामुळे 'आता जग बदलेल' मध्ये दिवाळीनंतर फटाके फुटण्याची शक्यता आहे.