'सूर्यवंशी' प्रकरणी मास्टर माईंड मोकाटच

उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले!
पोलिसांच्या निष्क्रीयतेविषयी उच्च न्यायालयाची नाराजी
 3 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबई- आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भावाने अन्य गुंडांच्या मदतीने ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यातील काही आरोपींना अटक केली असली, तरी पोलिसांनी आरोपींवर 307 कलम लावले नाही. तसेच या हल्ल्याचा मुख्य उद्देश व हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारापर्यंत (मास्टरमाइंड ) न पोहोचल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांवर तीव्र ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणी उर्वरित आरोपींना अटक करून 3 मे पर्यंत अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
पत्रकार सुधीर सूर्यवंशींवरील हल्ल्याप्रकरणी पोलीस तपास योग्यरित्या न झाल्याने तो तपास नि:पक्षपातीपणे व्हावा, हल्ल्यामागील हेतू स्पष्ट व्हावा व हल्ल्यातील मास्टरमाईंडला अटक व्हावी यासाठी सुधीर सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयात 10 एप्रिल रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होताना न्यायालयाने गुन्हे शाखा, खारघर पोलिसांना येत्या 3 मेपर्यंत संपूर्ण तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सत्ताधारी आमदारांच्या दबावामुळे पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाल्याने तपासात दिरंगाई होत होती. त्यामुळे न्यायालयाने संशयित आरोपींना अद्याप अटक का झाली नाही, याचीही विचारणा पोलिसांना केली आहे. 
     सूर्यवंशी हल्लाप्रकरणी पोलिसांनी आकाश कृष्णा पाटील, अशोक जोगनाथ भोईर, विश्‍वास आत्माराम काथारा, अनंता तुकाराम कथारा यांना अटक करून खारघर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 326,34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. 17 एप्रिल रोजी त्यांना जामीनही झाला; मात्र संतोष फताटे यांच्या जबानीतील या हल्ल्यामागचे सूत्रधार भार्गव ठाकूर, प्रशांत बाळाराम ठाकूर, मनोज आंग्रे, माजी नगरसेवक अनिल भगत यांची नावे वगळल्याने सुधीर सूर्यवंशी व संतोष फताटे यांनी उच्च नायालयात धाव घेतल्याचे त्यांचे वकील राहुल आरोटे यांनी सांगितले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलिसांना चांगले फटकारले आणि उर्वरित आरोपींना अटक करून 3 मेपर्यंत अहवाल सादर करा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी संशयाची सूई मास्टर माईंड म्हणून परेश ठाकूरकडे जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
...............

सुधीर सूर्यवंशींवर जीवघेणा हल्ला झाला आहे आणि ते त्यात गंभीर जखमी झाले आहेत. असे असताना पोलिसांनी गांभीर्याने तपास करायला हवा होता. मात्र तो केला नाही; म्हणून न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. 3 मेपर्यंत तापसाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
-    राहुल आरोटे, ज्येष्ठ वकील, उच्च न्यायालय