महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम कौतुकास्पद - दिवाकर रावते

पुणे - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने राज्यातील पत्रकारांना हेलमेट वाटप करण्याचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा पध्दतीने पत्रकारांची काळजी घेणारा हा राज्यातील एकमेव संघ आहे. त्यामुळे अशा पत्रकारांसाठी काम करणार्‍या या संघटनेला आपले पूर्णपणे सहकार्य राहील असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 12 वे राज्यस्तरीय अधिवेशन भोसरीतील रामस्मृती लॉन्स येथे रविवारी झाले. या अधिवेशनच्या दुसर्‍या सत्रात मार्गदर्शन करताना ना. रावते बोलत होते. 

माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्कार पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे यांना यावेळी प्रदान करण्यात आला. रुपये 51 हजार, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पगडी, स्मृतिचन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. अध्यक्षस्थानी एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर होते. स्वामी समर्थ सेवा गुरुकुल पीठाचे चंद्रकांत दादा मोरे यांना यावेळी क्रांतीदुत पुरस्काराने गौरविण्यात आले तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, उद्योजक माणिक डावरे, सचिन लबडे यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला.

प्रारंभी ‘माध्यमांचे बदलते स्वरुप’ या विषयावर आयोजीत चर्चासत्रात संपादक पुरुषोत्तम सांगळे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशीदास भोईटे, मिरर टाईम्स नाऊचे वृत्तसंपादक मंदार फणसे, संपादक अशोक सोनवणे यांनीही या चर्चासत्रात सहभाग घेतला. 

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, संपादक विजय बाविस्कर, पत्रकार संघाचे संस्थापक व संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, कार्याध्यक्ष वसंत मुंढे, सरचिटणीस विश्‍वास आरोटे, उपाध्यक्ष सोमनाथ देशकर, माजी नगरसेवक पंडीत गवळी, योगेश गवळी, संदीप भटेवरा, प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नितीन शिंदे, विदर्भ प्र्रमुख ईश्‍वरसिंह ठाकूर, बाळासाहेब देशमुख, अमरावती विभागीय अध्यक्ष निलेश सोमणी,  पुणे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे आदी उपस्थित होते.  

प्रसारमाध्यमांचे कितीही स्वरुप बदलले तरी पत्रकारांचे महत्व कायम आहे. मुरलीधर शिंगोटे यांनी उभा केलेला वृत्तसमुह आदर्शवत आहे. चंद्रकांत मोरे दादा यांचा आमचा जुना स्नेह आहे. प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपल्याला मानसिक आधार दिला. त्यांचे काम आणि कार्य मोठे आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. पत्रकारांनी समाजाच्या समस्या प्रभावीपणे मांडाव्यात असे आवाहनही ना. रावते यांनी यावेळी केले.


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने क्रांतीदुत पुरस्काराने केलेला सन्मान हा सर्व समर्थ सेवेकरी व स्वामी कार्याचा आहे. मी फक्त प्रातिनिधीक स्वरुपात स्विकारलेला आहे. पत्रकार संघाने स्वामीसमर्थ मार्गाची व कार्याची दखल घेतली असे प्रतिपादन स्वामी समर्थ सेवा गुरुकुल पीठाचे चंद्रकांत दादा मोरे यांनी केले. सद्गुरु मोरे दादा यांनी पायी व सायकलवर खडतर प्रवास करुन 50-55 केंद्र उभे केले, तेच कार्य गुरुमाऊलींनी पुढे नेऊन आज स्वामी समर्थ केंद्रांची संख्या 6 हजारावर गेली आहे. कृषी क्षेत्रामध्ये रासायनिक खतांचा वापर होत असल्याने त्यामुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतकर्‍यांनी सेंद्रीय खताचा वापर करावा. विवाह जमवताना गुण बघितले जातात मात्र नंतर हेच वरवधू आजाराने पिडीत असल्याचे निदर्शनास येते. विवाह जमवताना रक्ततपासणी करावी सल्ला त्यांनी दिला. स्वामी कार्याचा आढावा घेताना त्र्यंबकेश्‍वर येथील वीस एकर जागेवर सद्गुरु चॅरिटेबल हॉस्पिटल उभे राहत असल्याचे सांगितले. केंद्रामार्फत आयुर्वेद, अन्नछत्रालय, गोशाळा, छपाई, विनाहुंडा विवाह, बालसंस्कार, रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन व विज्ञानावर आधारीत सेवा याविषयी सविस्तर माहिती दिली.

विश्‍वासार्हता हेच पत्रकार आणि पत्रकारितेचे वैभव आहे, बातमीत तथ्य असेल तर पत्रकाराने निर्भीडपणे मांडावे, वृत्तपत्राचे नाते वाचकाशी असायला हवे, आजची माध्यमे दबावाखाली काम करीत आहेत, असे वाटत असून हे देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे पत्रकारांनी बातमीच्या माध्यमातून समाजाला सत्य तेच सांगावे, असे आवाहन  माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. सरकार कसे चांगले आहे, हे सांगण्यासाठी पत्रकारिता नसते, काय कमतरता आहे, हे दाखविणे पत्रकाराचा धर्म आहे.  पत्रकारांनी आपल्या लेखणीशी प्रतारणा करु नये, समाजाला सत्य सांगायचे काम करावे, डिजीटल युगात मोबाईलवर बातम्या समजतात अशी परिस्थिती असताना विश्‍वासार्हता जपण्याचे काम करावे, कोणाच्या दबावाखाली येऊन सत्याची कास सोडू नये, असे आवाहनही दर्डा यांनी केले.   

प्रसारमाध्यमांचे स्वरुप वेगाने बदलत असून ग्रामीण भागातील पत्रकारांनीही आता तंत्रज्ञानाला आत्मसात करावे. भविष्यात तंत्रज्ञान आणखी पुढे जाणार असून त्याचा आपण उपयोग करुन घ्यावा असे आवाहन संपादक राजीव खांडेकर यांनी केले.   राज्य सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांनी पत्रकार संघाने केलेल्या ठरावांची माहिती दिली. सुत्रसंचालन अनिल रहाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर येथील पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.