या विकृतींचा फक्त निषेध करून भागणार नाही

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी एका पत्रकार परिषदेत ( पत्रकार परिषद आटोपल्या नंतर) जाताजाता लक्ष्मी सुब्रह्मण्यम नावाच्या एका महिला पत्रकाराचा गालगुच्चा घेतला.राज्यपालांची ही कृती केवळ असभ्यपणाचीच नव्हे तर विकृत देखील म्हणावी लागेल.कोणत्याही अर्थाने या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही.कायद्याच्या भाषेत हा विनयभंग होता.राज्यपाल पदासारख्या घटनात्मक दृष्ट्या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीची ही कृती कायद्याच्या परिप्रेक्षात एक गंभीर गुन्हा आहे.एखादे राज्य घटनात्मक तत्वाचे पालन करते आहे अथवा नाही याचे परिनिरीक्षण करण्यासाठी आणि त्या संबंधी थेट राष्ट्रपतींशी संपर्क ठेवून घटनात्मक भूमिका घेण्यासाठी भारतीय राज्य घटनेत राज्यपाल पदाची तरतूद करण्यात आलेली आहे.निर्भया प्रकरणा नंतर महिला सुरक्षा विषयक कायद्यातजे बदल झाले त्यात एखाद्या स्त्रीची इच्छा नसताना तिच्या शरीराच्या कुठल्याही भागाला स्पर्श करणे हा दखलपात्र गुन्हा आहे.मग तो व्यक्ती कोणीही असो.सदरील घटनेत लक्ष्मी सुब्रह्मण्यम या महिला पत्रकाराने आपणास राज्यपालांची कृती आवडली नाही,त्या करीत मी निषेध व्यक्त करते असे म्हटले.नंतर राज्यपालांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.एवढ्याने या घटनेचे गांभीर्य संपते का ? उद्या आणखी कोणा राज्यपालाने,मंत्री वा खासदाराने,पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी अथवा एखाद्या सेलिब्रेटीने एखाद्या महिला पत्रकाराचा गालगुच्चा घेतला आणि त्याचा निषेध झाल्यावर दिलगिरी व्यक्त करून मोकळा झाला तर चालेल का ?
         या बाबत अनेक वर्ष एका संस्कारजन्य वर्तमानपत्रात पत्रकारिता केलेल्या प्रवीण बर्दापूरकर नावाच्या एका ज्येष्ठ मराठी पत्रकाराने आपल्या फेसबुक पोष्ट मध्ये केलेले राज्यपालांच्या कृतीचे समर्थन धक्कादायक वाटले.राज्यपालांची ती कृती वडीलकीच्या भावनेतून होती,त्या कडे स्वच्छ दृष्टीने पहावे, वगैरे बौद्धिक त्यांनी मांडले.काळ कसा सोकावतो पहा,बर्दापूरकरांच्या पोष्टनंतर दुसऱ्याच दिवशी तामिळनाडूतील एस. व्ही. शेखर नावाच्या एका भाजप नेत्याने  फेसबुकवर 'मदुराइ युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अँड द व्हर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल' या शिर्षकाखाली एक पोस्ट लिहिली.या पोष्ट मध्ये त्याने ज्या विकृत आणि घाणेरड्या भाषेत महिलापत्रकारां संदर्भात विधाने केली त्यात फक्त महिला पत्रकारांचाच नाही तर एकूणच मध्यमविश्वाची घोर विटंबना आहे.यात फक्त महिला पत्रकारांच्याच चारित्र्यावर नाही तर माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांच्या नैतिकतेवरही शिंतोडे उडवले आहेत. एस. व्ही. शेखरने काय लिहिले ते सर्वश्रुत आहे.त्याचा इथे पुन्हा उहापोह करण्याचे कारण नाही.परंतु इथे स्त्रीविषयक विकृत धारणे बरोबरच पत्रकार क्षेत्राबाबतही जो तुच्छतापूर्ण उल्लेख झाला त्याचा फक्त निषेध करून भागणार नाही.महिला पत्रकार नोकरी मिळवण्यासाठी,ती टिकवण्यासाठी,बढती आणि पगारवाढीसाठी,महत्वाची जबाबदारी मिळवण्यासाठी कॉम्प्रमाइज करतात असा सरळ सरळ आरोप शेखर ने केला.राज्यपालाच्या कृतीकडे ज्येष्ठांचे प्रेम म्हणून पहा असा हितोपदेश करणारे आमचे मित्र शेखरच्या फेसबुक पोष्टलाही कनिष्ठांचा बालिशपणा म्हणून सोडून द्यायला सांगणार का ?
       मुर्खांच्या नादाला लागण्यात अर्थ नसतो असे म्हणून शेखर सारख्याच्या वक्तव्याला अनुल्लेखाने मारायचे म्हटले तरी सोशलमिडीयावर त्याची पोष्ट व्हायरल होऊन बसली आहे.माध्यमांनी या बाबत फक्त निषेध करून डोळेझाक केली तर माध्यमे गप्प आहेत म्हणजे अफवेत तथ्य आहे असाच समाज अर्थ काढेल.म्हणूनच बनवारीलाल पुरोहित ,एस. व्ही. शेखर सारख्या विरुद्ध विनयभंग,तसेच सामूहिक अब्रुनुकसानीचे आणि मानहानीचे खटले दाखल केले पाहिजेत.कायद्यासमोर सर्व समान असतील तर एखाद्या सर्वसामान्य आरोपीने महिलाविषयक गुन्हा केल्यानंतर आपण पत्रकार त्या आरोपीचा उल्लेख नराधम असा करतो.तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि भाजपनेता एस. व्ही. शेखर याला सुद्धा तेच संबोधन वापरण्याचे धाडस जेव्हा आम्ही दाखवू शकू तेव्हाच कोणी कितीही मोठ्या पदावर असला तरी एखाद्या महिला पत्रकाराचा गालगुच्चा धरण्याची किंवा महिलापत्रकारा संबंधी आक्षेपार्ह बोलण्या लिहिण्याची हिम्मत करणार नाही.

---रवींद्र तहकिक
 कार्यकारी संपादक ,दैनिक लोकपत्र