कन्फर्म : जय महाराष्ट्र चॅनल अखेर विकले !

मुंबई - जय महाराष्ट्र चॅनल  अखेर इंडिया न्यूज ( हिंदी) चॅनलला विकल्याचे कन्फर्म झाले आहे. मालक सुधाकर शेट्टी यांनीच ही घोषणा कर्मचाऱ्यांच्या मिटिंगमध्ये परवा केली. मात्र त्यांनी जय महाराष्ट्रकडे ५० टक्के तर इंडिया न्यूजकडे ५० टक्के शेयर्स असतील, असे सांगून कर्मचाऱ्यांना धीर दिला आहे.

एकेकाळी लेडीज डान्स बार  चालवणाऱ्या सुधाकर शेट्टी यांनी २०१३ मध्ये जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरु केले होते. सुरुवातीला मंदार फणसे, रवी आंबेकर, तुळशीदास भोईटे हे  त्रिकुट संपादकीय मंडळावर   होते. नंतर शैलेष लांबे, समीरन   वाळवेकर,निलेश खरे, प्रसन्न जोशी, विलास आठवले ,  तुळशीदास भोईटे ( दुसरी वेळ ) संपादक झाले होते.  सध्या  आशुतोष पाटील, मनोज भोयर, आशिष जाधव, विनोद राऊत , तुषार शेटे हे रथी - महारथी आहेत. मात्र या चॅनलचा टीआरपी कधीच ४ च्या वरती गेला नाही. सध्या तर २ वरती टीआरपी आहे. वाढलेला खर्च आणि येणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने सुधाकर शेट्टी यांनी अखेर  चॅनल विकण्याचा निर्णय घेतला.

जय महाराष्ट्र चॅनल हे इंडिया न्यूज ( हिंदी) चॅनलला विकल्याची बातमी गेल्या दोन महिन्यापासून पसरली होती. मात्र आता कन्फर्म झाले आहे. जय महाराष्ट्र चॅनल अंधेरीहुन बीकेसी ( बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स ) मध्ये लवकरच शिफ्ट होणार आहे. सध्या येथे नव्या स्टुडिओचे काम सुरु आहे. 
टीव्ही ९ मराठी सोडलेल्या रोहित विश्वकर्मा यांच्याकडे  जय महाराष्ट्रचा  चार्ज असेल व तेच संपादक असतील असे सांगितले जात आहे. तसेच टीव्ही ९ मराठीमध्ये अनेक वर्ष इनपुट हेड राहिलेल्या व सध्या इंडिया न्यूज ( हिंदी) मध्ये  महाराष्ट्र ब्युरो असलेल्या प्रीती सोमपुराकडे इनपुट हेड पद असेल, असे कळते. नव्या टीममध्ये काही नवे चेहरे दिसणार  आहेत.

सध्या जय महाराष्ट्र मध्ये असलेल्या आशुतोष पाटील, आशिष जाधव, तुषार शेटे यांच्यावर टांगती तलवार दिसत आहे. त्याचबरोबर काही  निष्क्रिय कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ देण्यात येणार असल्याचे कळते.  चॅनल विकल्यामुळे काहींना आनंद तर काहींना दुःख झाले आहे.