आंदोलन चालुच ठेवण्याचा समितीचा निर्धार

नागपुर - पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचा मसुदा  मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत मांडून तो मंजूर  होईल यासाठी मी  प्रयत्न करतो, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर पत्रकारांचे आमरण   उपोषण स्थगित ठेवण्याचा निर्णय पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने  घेतला आहे. मात्र  कायद्यासाठीचे आंदोलन यापुढेही महाराष्ट्रात  सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण पत्रकार हल्ला कृती समितीचे निमंत्रक  एस. एम. देशमुख यांनी नागपुर येथे पत्रकार परिषदेत केले आहे.
एस. एम. देशमुख, .पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक व ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम  हे बुधवारपासून नागपूर येथे आमरण  उपोषणाला बसले होते.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या  एका शिष्टमंडळाने  गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांची "रामगिरी'' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी  कायद्याबाबत सरकारची भुमिका  सकारात्मक  असून कायद्याचा मसुदा  कॅबिनेटसमोर ठेवून तो मंजूर  करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर "प्रेस  कमिशन  नेमन्याबाबत' अभ्यास करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही  मुख्यमंत्र्यांनी   स्पष्ट केले. पत्रकारांवरील हल्ल्यांसंदर्भात अस्तित्वात असलेल्या शासकीय समित्यांना  अधिक अधिकार देवून त्या सक्षम  करण्यात येतील. याशिवाय अधिस्वीकृती समित्या  या महिन्याच्या आत  पुनर्गठीत करून त्या अस्तित्वात आणण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.मुख्यमंत्र्यांनी  आश्वासन देऊन  उपोषण मागे  घेण्याची विनंती केल्यानंतर समितीने  आमरण  उपोषण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. उपोषण स्थगित ठेवले असले तरी कायद्यासाठीचा हा लढा संपलेला नसून  मुख्यमंत्र्यांनी  आपला शब्द पाळला नाही. तर सहा जानेवारीपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा  एस. एम . देशमुख  व किरण नाईक यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांना आज भेटलेल्या शिष्टमंडळात  एस. एम . देशमुख , प्रफुल्ल  मारपकवार, किरण नाईक, सुरेंद्र गांगण, यदु जोशी, सुभाष भारद्वाज, पुरुषोत्तम आवारे पाटील आदींचा समावेश  होता. मुख्यमंत्र्यांशी  चर्चा झाल्यानंतर माहिती  संचालक श्रद्धा बेलसरे, उपसंचालक शिवाजी मानकर , मुख्यमंत्र्यांचे  जनसंपर्क अधिकारी सतीश लळित, अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी उपोषण स्थळास भेट देवून  एस. एम . देशमुख  , मराठी  पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक व ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम  यांना सत्र्यांचा रस देवून उपोषण सोडण्याची विनंती केली. यावेळी शरद पाबळे, चंद्रशेखर मेश्राम , सिद्धार्थ शर्मा , बबनराव वाळके, राजू पवार, सुनील वाळूंज, श्रीराम  कुमठेकर  आदींसह मोठ्या  संख्येने पत्रकार उपस्थित होते. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार राज्यातील पत्रकारांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण यशस्वी केल्याबद्दल पत्रकार हल्ला कृती समितीच्या  वतीने राज्यातील पत्रकारांचे आभार मानण्यात  आले.