मंत्रालयातील अनेक पत्रकार मौनीबाबा - राजीव खांडेकर

बीड - मंत्रालयातील अनेक पत्रकार मौनी बाबा आहेत. ते मंत्र्याच्या पत्रकार परिषदेला हजर राहतात, मात्र कधीच प्रश्न विचारत नाहीत. ऐवढेच नाही तर बातमी लिहिण्यासाठी कधीच पेन उचलत नाहीत.या पत्रकारांनी चांगल्या पत्रकारांची जागा अडवून ठेवली आहे, असे मत ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी येथे व्यक्त केले.
बीड येथील कै.वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात १ जानेवारी रोजी दुपारी खांडेकर यांचे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ग्रामीण पत्रकार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रमेश पोकळे, उस्मानाबाद लाइव्हचे मुख्य संपादक सुनील ढेपे, पत्रकार वसंत मुंडे, संतोष मानूरकर, महेश वाघमारे आदी उपस्थित होते.
जागतिकीकरणाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच पत्रकारिता क्षेत्रातही नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या संधी अशाच राहतील, या भ्रमात न राहता या क्षेत्रात येऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांनी  नवीन तंत्रज्ञानाला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल. बदलाच्या लाटेवर स्वार व्हा, असे आवाहनही राजीव खांडेकर यांनी केले.

खांडेकर म्हणाले, दूरचित्रवाहिन्यांमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. १९८८-८९ पर्यंत केवळ दूरदर्शनवर जेवढे कार्यक्रम प्रसारित व्हायचे, आज त्यातील प्रत्येक कार्यक्रमांवर आधारित स्वतंत्र वाहिन्या आहेत, एवढं हे क्षेत्र विस्तारलं आहे. हे चित्र पुढील किती वर्षे राहील, याविषयी साशंकता आहे. अमेरिकेत वेबसाईटवरुनच चॅनेलवरील कार्यक्रम पाहातात. आठवडाभरातील मालिकांचे भाग एकत्र करुन सोईनुसार पाहातात, ते तंत्र भारतातही येत आहे. त्यामुळे टेलिव्हिजन कंपन्यांनी संशोधन कमी केलं आहे.

थ्रीजी मोबाइलवर बातम्या पाहू शकता. आगामी काळात फोरजी, फाइव्हजी तंत्रज्ञान येईल, तेव्हा टेलिव्हिजन, दैनिकांची मक्तेदारी संपुष्टात येत चाललेली दिसेल. जग जेवढं जवळ येत चाललं आहे, तेवढी माणसे संकुचित होत आहेत.

तेंव्हा बदल स्वीकारून नव्या परिस्थितीला तोंड देण्याचं कौशल्य आत्मसात करावं लागेल, असे खांडेकर यांनी सांगितले. ग्रामीण भागातील युवकांच्या गुणवत्तेवर माझा विश्वास आहे. खेड्यातून शहरात जाताना निर्माण होणार्‍या परिस्थितीपेक्षा पत्रकारितेत येताना मनापासून निष्ठेने काम करा. उद्दिष्ट गाठताना मोहाला बळी पडाल तर तिथेच गाडी घसरेलव गुणवत्ता असूनही सावरण अवघड होईल, असे त्यांनी सांगितले. चांगला पत्रकार होण्यासाठी स्वत:वर विश्वास आणि अंगात धाडस लागते, असे सांगून, खांडेकर म्हणाले की,एखाद्या नवख्या पत्रकारांने पत्रकारितेच्या क्षेत्रात एन्ट्री केली की,त्याला प्रस्थापित पत्रकार नामोहरण करण्याचा प्रयत्न करतात.मात्र या नवख्या पत्रकारांनी न्यूनगंड न बाळगता,आपले कर्तृत्व पणाला लावावे.
मुंबई - पुण्यापेक्षा कितीतरी चांगले पत्रकार  ग्रामीण भागात आहेत. खरे टॅलेंट ग्रामीण भागातून आलेल्या पत्रकारांतच आहे. जेव्हा ग्रामीण पत्रकार मुंबईत येतात,तेव्हा त्यांच्यात काहीतरी नविन करण्याची धमक असते.ते कितीही वेळ काम केले तरी थकत नाहीत,म्हणून ABP माझाने टीमची निवड करताना ग्रामीण पत्रकारांना अधिक संधी दिली व त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळाला.प्रत्येक रिपोर्टरने त्याच्या भाषेतच बोलावे,असा ABP माझाचा कटाक्ष आहे.जेणेकरून हे न्यूज चॅनेल आपले वाटेल.
२० वर्षापुर्वीची पत्रकारिता आणि आताच्या पत्रकारितेत अमुलाग्र बदल झाला आहे, काळाच्या बदलाबरोबर पत्रकारांना त्यावर स्वार व्हावे लागेल अन्यथा ते मागे पडतील.येणारा काळ मोबाईल काळ राहणार आहे.ज्यांना न्यूजमध्ये इंटरेस्ट आहे, ते  हवा तो फोटो काढून अथवा एखाद्या घटनेचे व्हीडिओ शूटींग करून इंटरनेटवरील सोशल साईटस् फेसबुक, टयुटर,युटूबवर लोड करून,आपल्या चाहत्यांसाठी खुले करू शकतो,त्यामुळे आगामी काळात कोणत्याही इलेक्ट्रॉनिक अथवा प्रिंट मीडियातील कोणाचीही मक्तेदारी राहणार नाही.येणारा काळात वेवसाईटस् अधिक कार्यक्षम होतील,असेही ते म्हणाले.
बदनामीचा कलंक लागू देवू नका
अनेक चांगले पत्रकार कुठल्या तरी अमिषाला अथवा व्यभिचाराला बळी पडून, बाजूला फेकले गेले आहेत.हा अनुभव लक्षात घेवून पत्रकारांनी आपले चारित्र्य जपावे,असा मौलीक सल्लाही राजीव खांडेकर यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात रमेश पोकळे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बदलांना यशस्वीपणे तोंड द्यावे, यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळे उपक्रम आयोजीत करण्यात येतात.अल्पावधीतच वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाने पत्रकारीता क्षेत्रात मराठवाडाभर वेगळा ठसा निर्माण केला असून या महाविद्यालयाचे जवळपास ११५ विद्यार्थी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या दैनिकामध्ये, शासकीय कार्यालय, इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये करिअर करत असल्याचा अभिमान आम्हास आहे. पत्रकारिता महाविद्यालयात शासनाने अनुदान सुरू करावे,यासाठी राजीव खांडेकर यांनी आपली ताकद पणाला लावावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी केंद्र सरकारच्या नाट्यसमितीवर मराठवाड्याचे एकमेव सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ.सतिश साळुंके यांचा खांडेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार व्यंकटेश वैष्णव यांनी केले तर विद्यार्थी संसद सचिव गणेश सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार, प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


साभार - बीड लाइव्ह