पत्रकारास पोलीस निरीक्षकांकडून बेदम मारहाण ...

एका प्रादेशिक वृत्तपत्राच्या वार्ताहराला बेमुर्वतपणे वाहनात कोंबून अट्टल गुन्हेगाराची वागणूक देणारे धानोरा ( गडचिरोली) येथील पोलिस उपनिरीक्षक वैभव माळी यांच्या विरोधात जनआक्रोश तीव्र झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी श्री़ माळी यांची आज ३१ आॅगस्ट रोजी तडकाफडकी बदली करून त्यांना सिरोंचा तालुक्यातील असरअली उपपोलिस ठाण्यात पाठविले़
धानोरा येथील एका प्रादेशिक वृत्तपत्राचे वार्ताहर अल्लाउद्दीन लालानी यांच्या विरोधात वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करुन समाजात बदनामी केल्याची तसेच पैशासाठी तगादा लावत असल्याची तक्रार एका मुख्याध्यापकाने ३० आॅगस्ट रोजी धानोरा पोलिस ठाण्यात केली होती़ या तक्रारीच्या अनुषंगाने प्रभारी पोलिस निरीक्षक वैभव माळी यांनी आज सकाळी १० वाजता पोलिस ताफ्यासह शहरातील बसस्थानकाशेजारी असलेले अल्लाउद्दीन लालानी यांचे दुकान गाठले. यावेळी कोणतीही विचारपूस न करता पोलिसांनी ५० वर्षीय लालानी यांना बेमुर्वतपणे उचलून जनावरासारखे वाहनात कोंबले. त्यानंतर पोलिसांनी लालानी यांना पोलिस ठाण्यात नेले.
घटनेची माहिती होताच बसस्थानकावर हजारो नागरिक गोळा झाले़ त्यांनी पोलिसांच्या अरेरावीचा निषेध करीत बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे गडचिरोली-राजनांदगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर हजारो नागरिकांनी पोलिस ठाण्यावर धडक देऊन ठाणेदार माळी यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी करून त्यांचा पुतळा जाळला़ दुपारी ३ वाजता आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आंदोलनस्थळी पोहचून उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांची भेट घेतली. यावेळी काँग्रसेच जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, जि. प. महिला व बाल कल्याण सभापती निरांजनी चंदेल, जि. प. सदस्य मनोहर पोरेटी, चांगदेव फाये, जमीर कुरेशी, मल्लीक बुधवानी, शिवसेना तालुकाध्यक्ष मुन्ना चंदेल, अनंत साळवे, नंदू कुमरे, सरपंच माणिकशहा मडावी, ग्रा. पं. सदस्य गणोरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नरेश बरगेवार, माधव गोटा, ललीत बरच्छा, पत्रकार सीताराम बडोदे, समीर कुरेशी, अभय इंदूरकर आदी उपस्थित होते.
नागरिकांचा तीव्र असंतोष आणि राजकीय पदाधिकार्‍यांचा दबाव लक्षात घेता पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रकरणाची शहानिशा करून ठाणेदार माळी यांची सिरोंचा तालुक्यातील असरअली पोलिस ठाण्यात तडकाफडकी बदली केली़ काही वेळाने वार्ताहर अल्लाउद्दीन लालानी यांची सुटका करण्यात आली. वैभव माळी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली़ वैभव माळी हे क्षुल्लक कारणावरून नागरिकांना बेदम मारहाण करीत असल्याच्या अनेक तक्रारी तत्कालीन पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आल्या होत्या़