मुंबई - एबीपी
माझा व्हाया जय महाराष्ट्र करून बीबीसी मराठीमध्ये गेलेले स्टार अँकर
प्रसन्न जोशी पुन्हा एबीपी माझा च्या वाटेवर आहेत. जोशी एबीपी माझामध्ये
आल्यास नम्रता वागळे आणि अभिजित करंडे यांची मोठी अडचण होणार आहे.
प्रसन्न
जोशी सात ते आठ वर्ष एबीपी माझामध्ये होते.रात्री नऊ वाजता होणाऱ्या माझा
विशेष या डिबेट शोचे ते अँकरींग करीत होते.शांत आणि संयमी असलेले प्रसन्न
जोशी समोरच्याला प्रश्नाला उपप्रश्न विचारून निरुत्तर करीत होते. त्यांचे
अँकरिंग अनेकांना भावले होते. त्यांच्या डिबेट शोचा टीआरपीही चांगला होता.
पण दीड वर्षांपूर्वी ते अचानक एबीपी माझा सोडून जय महाराष्ट्र मध्ये गेले
होते. एक वर्ष काम केल्यानंतर जय महाराष्ट्र चॅनलला जय महाराष्ट्र करून
चार महिन्यापूर्वी बीबीसी मराठी या डिजिटल मीडियासाठी दिल्ली मध्ये गेले
होते. बीबीसी मराठी दसऱ्या दिवशीच सुरु झाले होते, पण जोशी दिल्लीमध्ये फार काळ रमले नाहीत . मुळात डिजिटल मीडियात जाणे हा त्यांचा निर्णय अनेकांना चुकीचा वाटत होता. अखेर प्रसन्न जोशी एबीपी माझाच्या वाटेवर असल्याची बातमी थडकली आहे. ते लवकरच एबीपी माझा जॉईन करतील अशी शक्यता आहे.