ठरलं ! जय महाराष्ट्र आणि इंडिया न्यूजमध्ये फिफ्टी - फिफ्टी !!

मुंबई -  सर्वात खाली गेलेले  जय महाराष्ट्र न्यूज चॅनल वर काढण्यासाठी अखेर नवा मित्र मदतीला आला आहे.  जय महाराष्ट्र आणि इंडिया न्यूज चॅनलची पार्टनरशिप पक्की झाली असून, येत्या महिनाभरात सर्व प्रक्रिया पार पडणार आहेत. त्यानंतर जय महाराष्ट्र चॅनल नव्या लूक मध्ये दिसणार आहे.

मराठी न्यूज चॅनल्समध्ये जय महाराष्ट्र न्यूज चॅनल  सर्वात खाली आहे. अगदी सुरुवातीपासून त्याचा टीआरपी कधीच पाचच्या वरती गेला नाही, आता तर दोन ते तीन वर टीआरपी आहे. त्यात वेळेवर पगारी नसल्याने आणि तीन ते चार महिन्यांच्या पगारी थकल्याने चॅनलमध्ये अस्वस्थता आहे. अनियमित वेतनाच्या विरोधात सर्व रिपोर्टर आणि कॅमेरामन यांनी कामबंद आंदोलनही केले होते.त्यानंतर एक महिन्याचे वेतन देवून बोळवण करण्यात आली होती. 

वेळेवर पगार नसल्याने जुने कर्मचारी सोडून जात आहेत आणि नवीन कोण यायला तयार नाही. त्यामुळे चॅनलची वाट लागली आहे. तुळशीपत्राच्या काळात सर्वात मोठी वाट लागली, तेव्हा चॅनल जे गाळात रुतले ते वरती यायला तयार नाही. अखेर मालक सुधाकर शेट्टी यांनी चॅनलची अर्धी भागीदारी इंडिया न्यूज वाल्यास विकली आहे.

मध्यंतरी जय महाराष्ट्र चॅनल इंडिया न्यूज चॅनल टेकओव्हर करणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, त्या खऱ्याही होत्या, पण इंडिया न्यूज ने बंगाली चॅनल मध्ये लक्ष घातल्याने जय महाराष्ट्र चॅनलकडे दुर्लक्ष झाले होते, आता बंगाली चॅनल सुरू झाल्यानंतर इंडिया न्यूज वाले  जय महाराष्ट्र चॅनल कडे वळले आहेत.सध्या जय महाराष्ट्र चॅनल इंडिया न्यूज चे फीड वापरत असल्याचे ही टीव्ही स्क्रीनवर दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जय महाराष्ट्र आणि इंडिया न्यूज चॅनल मध्ये 50 - 50 टक्के भागीदारी आहे, सर्व तांत्रिक सहकार्य इंडिया न्यूज करणार ! काही जुने आणि काही नवे कर्मचारी घेवून चॅनल टेकओव्हर होणार आहे. १ जानेवारी पासून हे चॅनल नव्या व्यवस्थापनाकडे असेल, असे सांगितले जात आहे.

जे कर्मचारी निष्क्रिय आहेत त्यांना नारळ देण्यात येणार आहे, त्यामुळे  काम कमी आणि फुशारक्या जास्त  मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार दिसत आहे. दरम्यान, जय महाराष्ट्र चॅनल इंडिया न्यूजने टेकओव्हर केल्यानंतर ते स्पर्धेत येणार का ? याबाबत औत्सुक्य आहे.