अनंत दीक्षित अनंतात विलीन ...

पुणे - ज्येष्ठ पत्रकार आणि  'सकाळ' चे माजी समूह संपादक अनंत दीक्षित ( वय ६७ ) यांचे सोमवारीसायंकाळी एका खासगी हॉस्पिटलमध्ये  निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक प्रगट केला आहे. 


अनंत दीक्षित हे मूळचे सोलपूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी .  त्यांचे शिक्षण बार्शीतच झाले. पुण्यात त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूर आणि पुन्हा पुणे असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास राहिला.

 ते बरेच वर्षे कोल्हापूर सकाळचे संपादक होते. त्यानंतर ते पुण्यात सकाळ मध्ये रुजू झाले होते. सकाळचे ते काही वर्षे मुख्य संपादक होते. जवळपास २० वर्षे सकाळ मध्ये काम केल्यानंतर ते पुणे लोकमतमध्ये गेले  होते. एक अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. दीक्षित हे  रविवार सकाळ मध्ये गीतकार गुलजार यांच्याशी बोलून एक  कॉलम लिहीत असत.त्यांचा हा कॉलम वाचकप्रिय झाला होता.त्यांचे आणि गुलजार यांचे निकटचे संबंध होते.

मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या जाणकार संपादकांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जायचं. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. तटस्थ राजकीय विश्लेषक म्हणूनही, त्यांची ओळख होती. तसेच साहित्य विषयक त्यांचा व्यासंग होता. पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान होते. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण विश्लेषण तसेच, शैलीदार वक्तृत्व हे त्यांच्या व्यक्तीमत्वातील विशेष गुण होते. निवृत्तीनंतर गेल्या काही वर्षांत त्यांनी न्यूज चॅनेलवर राजकीय विश्लेषक म्हणूनही आपली स्वतंत्र छाप पाडली होती.

कोल्हापूर शहराशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. कोल्हापूरशी आणि तिथल्या माणसांशी असणारी त्यांची नाळ शेवटपर्यंत कायम होती. त्यांच्या माग पत्नी अंजली, कन्या अमृता, नात चार्वी आणि जावई, असा परिवार आहे. त्यांची कन्या स्कॉटलंडमध्ये असते. ती मंगळवारी संध्याकाळपर्यंत पुण्यात परतेल. त्यानंतर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. 

महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची बूज राखणारा, सडेतोड आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात संपादकीय जाणीवा जिवंत ठेवणारा सच्चा पत्रकार, संपादक म्हणून अनंत दीक्षित स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, कोल्हापूरच्या विकासाला आपल्या लेखणी आणि वाणीने आकार देण्यात दीक्षित यांचा मोठा वाटा होता. साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील त्यांचे योगदान करवीरवासिय कायमच स्मरणात ठेवतील. राज्यातील अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर त्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली. त्यांचे विवेचन वस्तुनिष्ठ आणि तर्कावर असायचे. प्रश्न धसास लागेपर्यंत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमांतून प्रयत्न केले. नवे लेखक आणि कवी यांना सकाळच्या माध्यमातून त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे अनेक लेखक कवी घडले.

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अनंत दिक्षीत यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यासंगी, ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी अनंत दिक्षीत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अनंत दिक्षीत हे विचारांनी परखड व अनेक पत्रकारांचे आदर्श होते. पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. कोल्हापूर आणि पुण्याशी त्याचं जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांच्या संस्कारातून घडलेले पत्रकार यापुढच्या काळात त्यांचे विचार पुढे नेतील, असा मला विश्वास आहे.

दीक्षित सरांचे शेवटचे पत्र, कोल्हापूरसाठी...  

ता. 22-11-2019

कोल्हापूरकराना पत्र

सर्व मित्रांना

स.न.
आपल्याशी संवाद साधण्यासाठी हा पत्रप्रपंच आहे. सतत कोल्हापूरची आठवण येते. लोकही मनापासून प्रकृतीची चौकशी करतात. अलीकडे माझ्या मनाने हळवेपणाचा सूर पकडलेला दिसतो. प्रकृती आणि त्यामुळे येणारे क्षण फार विचित्र असतात. एक दिवसाआड डायलिसिस सुरू आहे.  अलोपॅथी  आणि होमिओपॅथी असा कार्यक्रम सुरू आहे. ज्यादिवशी डायलिसिस सुरू असते त्यादिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बराच त्रास होतो. त्रासाचा अटळ भाग म्हणून अंथरुणावर पडून रहावे लागते. प्रकृतीची क्षीणता एवढ्या टोकाला गेली आहे की, नव्याने किंवा पूर्वीप्रमाणे वाचन अशक्य झाले आहे. मेंदूला कोणतेही ओझे अजिबात चालत  नाही. त्यामुळे जो जीवनक्रम आहे, त्यात  दुःखसंपन्नता आहे. म्हणजे मी हतबल झालो आहे असे नव्हे. कुटुंबाची म्हणजे माझी पत्नी सौ. अंजलीची साथ देण्याची धमक अपूर्व आहे. जीवनाच्या गाभ्याविषयी तिला असलेली समज माझ्यापेक्षा कितीतरी पुढची आहे. सतत कोणता ना कोणता तरी  विचार करण्याची  सवय मला अडचणीची ठरली आहे. विचार करण्याने  मनाच्या गरजा हा पैलू   माझ्या कधी लक्षातच आला नाही. मन मारणे चांगले नाही, मनाला विवेकाची साथ आवश्यक आहे हे खरे असले तरी आत्मनियंत्रण सैल झाल्यास कठीण स्थिती येते. कळते पण वळत नाही ही ती स्थिती होय. माझ्या मुलीच्या म्हणजे अस्मिताच्या मृत्यूनंतर प्रत्येक क्षणी अंतःकरणात प्रचंड अस्वस्थतता असते. कित्येकांना मी आधार दिला पण माझे दुःख मला झेपत नाही. अशावेळी जुन्या आठवणी, मैत्री नजरेसमोर उभी राहिली की मी अनावर होतो. शारिरिक त्रास असा असतो की, जेव्हा शरीर कासावीस असते तेव्हा तो त्रास सांगायला आवश्यक असलेली पूर्णता हरवून जातो. मानसिक त्रासाचे स्वरूप असे असते की,पोटात कालवाकालव होते. तरीही माझ्या पत्नीच्या जिद्दीवर वाटचाल सुरू आहे. तिलाही गुडघेदुखीचा त्रास आहे. माझी थोरली मुलगी अमृता आणि नात चार्वी स्कॉटलंडला असते. ती दररोज मला फोन करत असते. तिची घनव्याकुळता आपण सर्वजण समजू शकता.  या सगळया वातावरणात वाचनात पडलेला खंड आणि लोकांमधली उठबस संपल्याचे शल्य टोकदार आहे.

आपला,
अनंत दीक्षित





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या