नांदेडच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी १८ पत्रकार ईडीच्या रडारवर

एबीपी माझाने "त्या" पत्रकारांची नावे जाहीर करण्याची मागणी 




नांदेड :नायगाव, कृष्णूर धान्य घोटाळ्या प्रकरणी अनेक पत्रकार ईडीच्या रडारवर असल्याचं कळत आहे. लाखो रुपये उकळल्याची आरोपीनं ईडीकडे कबुली दिली आहे. तसेच आरोपीकडून 18 पत्रकारांची नावं ईडीकडे सुपूर्द करण्यात आली आहे., असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. त्या पत्रकरांची नावे  चॅनलने जाहीर करावीत, अशी मागणी नांदेड जिल्हा पत्रकार संघाने केली आहे. 

राज्यभर गाजलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव, कृष्णुर येथील धान्य घोटाळ्यात आता अंमलबजावणी संचालनालयाने उडी घेतली आहे. याच प्रकरणी यातील मुख्य आरोपी असलेल्या इंडिया ऍग्रो अनाज लिमिटेड कंपनीचा मालक अजय बाहेती यांच्या विरोधात मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा नोंदवत ईडीने त्याला अटक केलीय. तर नांदेड न्यायालयाने अजय बाहेती याला आठ दिवसाची कोठडी सुनावली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील कृष्णुर एमआयडीसीमध्ये अजय बाहेती यांची इंडिया ऍग्रो अनाज लिमिटेड नावाची कंपनी आहे.

अजय बाहेती हा अन्न पुरवठा विभाग व धान्य वितरण यंत्रणेला हाताशी धरून शासकीय वितरणाचा गहू व तांदूळ चोरीच्या मार्गे थेट आपल्या कंपनीत उतरवून घेत होता. त्यावेळी नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या कंपनीमध्ये धान्याची अवैध वाहतूक होत असताना 11 ट्रक पकडण्यात आले. त्यानुसार कुंटुर पोलीस ठाण्यात 11 ट्रक चालकासह मुख्य आरोपी अजय बाहेती, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, व्यवस्थापक ओमप्रकाश तापडिया, वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार आणि ललित खुराणा यांच्यासह 19 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.

पुढे हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यात अजय बाहेती, संतोष वेणीकरसह 19 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतरही जामिनावर सुटलेल्या अजय बाहेती याचे गोरखधंदे सुटले नाहीयेत. कारण याच इंडिया अनाज ऍग्रो कंपनी अंतर्गत हजारो शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून वर्ष लोटले तरी शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. तसेच या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी महसूलचा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हा सीआयडी, पोलीस विभागाच्या हातावर तुरी देऊन गेल्या वर्षभरापासून फरार आहे. तर सदर प्रकरणातील फरार आरोपी संतोष वेणीकर हे भूसंपादन कार्यालय परभणी येथे रुजू झाल्याची माहिती मिळतेय. सदर आरोपीस या अगोदरच न्यायालयाने त्याच्या नावाने जागोजाग पोष्टर लावून त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप संतोष वेणीकर मात्र फरार आहे.

त्यानंतर गुरुवारी ईडीने या प्रकरणात सतर्कता दाखवत बाहेतीला अटक केलीय. तसेच घोटाळ्याची बातमी प्रकाशित न करण्यासाठी अनेक पत्रकारांनी आरोपींकडून लाखों रुपये उकळल्याची माहिती आरोपीने ईडीला दिल्यामुळे अनेक पत्रकार ईडीच्या रडारवर आहेत. कृष्णुर धान्य घोटाळ्यातील आरोपींकडून लाखो रुपये उकळल्याची आरोपीने ईडीकडे कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक दिगग्ज वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधी व वृत्त पत्राच्या प्रतिनिधींचे नावे आरोपीकडून ईडीकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळतेय. ईडीची पीडा मागे लागण्याचे संकेत मिळाल्याने अनेक पत्रकारांचे अवसान गळून धाबे दणाणलेत, असे या बातमीत म्हटले आहे. 


एबीपी माझाने "त्या" पत्रकारांची नावे जाहीर करावीत 

एबीपी माझाच्या या बातमीमुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकार संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. त्याकरिता त्या १८ पत्रकरांची नावे  जाहीर करावीत, जेणे करून अन्य पत्रकरांची बदनामी थांबेल, असे या निवेदनात  म्हटले आहे. या  निवेदनावर ५० हुन अधिक पत्रकारांच्या सह्या आहेत. 

एबीपी माझा हे जबाबदार माध्यम आहे. बातमी योग्य शहनिशा करून दिलेली असेल तर त्या १८ पत्रकारांची  नावे  देण्यास कोणती अडचण आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. 

हेच ते निवेदन 




एबीपी माझाचा रिपोर्टरच  वादग्रस्त

नांदेड जिल्ह्यातील १८ पत्रकार ईडीच्या रडारवर बातमी देणारा नांदेडचा रिपोर्टरचा वादग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. या रिपोर्टरवर नांदेड सह हिंगोली जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहितीअमोर आली आहे. 


त्याची नियुक्ती देताना पडताळणी केली नाही का असा सवाल आता केला जात आहे. विशेष म्हणजे एबीपी माझामध्ये लागताच नांदेडच्या खोट्या आणि कपोकल्पित बातम्या देऊन या प्रतिनिधीने धुमाकळ घातल्याचे नांदेडच्या पत्रकारांनी सांगितलंय.


एबीपी माझाने अश्या माणसाने दिलेली ही बातमी न खातरजमा न करताच प्रसारित कलेची,  त्यामुळे नांदेडचे पत्रकार आता संतापले असून एबीपी विरुद्ध न्यायालयात तक्रार करणार असल्याचे समजते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या