पत्रकारांच्या संरक्षणासाठी हे सरकार उदासीन !

- ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांची टीका



शिर्डी - पत्रकारांच्या संरक्षणासाठी आमच्या सरकारने कायदा केला. परंतु, त्याची योग्य अमलबजावणी महाआघाडी सरकारने केलीच नाही, असा गौप्यस्फोट करत, हे सरकार पत्रकारांच्या संरक्षणासाठी उदासीन आहे, अशी टीका माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पत्रकारांना पेन्शन व योग्य वेतन मिळण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. परंतु, वृत्तपत्रांच्या मालकांनी याकामी सरकारवर दबाव निर्माण केला, असा गौप्यस्फोटही विखे यांनी राज्य पत्रकार संघाच्या १८ व्या अधिवेशनात शिर्डी येथे केला.


महाराष्ट्र पत्रकार संघाचे १८ वे अधिवेशन शिर्डी येथे पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून विखे पाटील बोलत होते. अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डीचे माजी खासदार तथा भाजपनेते भाऊसाहेब वाकचौरे, पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, उस्मानाबाद व पुणे लाईव्हचे संपादक सुनील ढेपे, साधना न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे, भाजपचे प्रवक्ते आणि माजी न्यूज अँकर अजित चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते. 


आपल्या भाषणात विखे यांनी राज्य सरकारच्या पत्रकारविरोधी धोरणांवर सडकून टीका केली. पत्रकारांना प्रतिनिधी विधीमंडळात घेण्याबाबत येथे चर्चा झाली आहे. सर्वात पहिले तुम्ही तुमच्यातील गटबाजी संपवून एकत्रितपणे ही मागणी पुढे आणा, असा चिमटाही यावेळी विखे यांनी काढून, आपण व आपला पक्ष पत्रकारांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही, त्यांनी दिली. 


 अधिवेशनाचे प्रमुख वक्ते व ज्येष्ठ संपादक सुनील ढेपे यांनी 'डिजिटल मीडिया - पत्रकारासाठी एक संधी' या विषयावर विचारपुष्प गुंफले. ते म्हणाले, हातात पेन घेऊन कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले आहे. पत्रकारांनी काळाबरोबर स्वतःला अपग्रेड केले पाहिजे, सध्याचे युग डिजिटल मीडियाचे असून, फाईव्ह जी सुरु झाल्यानंतर मीडियात आणखी क्रांतिकारक बदल होतील. कागदाचे वाढलेले भाव आणि एकदंरीत खर्च यामुळे येत्या तीन वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडून त्याची जागा ई-पेपर घेतील, पण यापुढे ई-पेपर वाचण्यासाठी पैसे मोजावे लागतील. सध्या चालू असलेल्या न्यूज चॅनललादेखील घरघर लागेल आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अनेक डिजिटल चॅनल उदयास येतील. डिजिटल मीडिया हेच भविष्य असल्याने पत्रकारितेत कार्यरत असलेल्या प्रत्येकाला डिजिटल मीडियाचे सर्व ज्ञान असायला हवे, असे याप्रसंगी ढेपे यांनी सांगितले.



साधना न्यूजचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे म्हणाले, की सोशल मीडियामुळे पत्रकारांची मक्तेदारी संपली असून, आज प्रत्येकजण पत्रकार झाला आहे. मालक लोकं जोपर्यंत पत्रकारांच्या हिताचा विचार करत नाही, तोपर्यंत पत्रकारांच्या पोटापाण्याचा मूळ प्रश्न सुटणे अवघड आहे. पत्रकारांचा प्रतिनिधी विधीमंडळात गेला पाहिजे, पण त्यासाठी राज्यातील दोन लाख पत्रकार एकत्र यावे लागतील. पत्रकार संघटनांचे सवतेसुभे मोडित काढावे लागतील. ग्रामीण पत्रकारांनी आता कमिशनवर काम करण्याऐवजी पगाराची मागणी रेटली पाहिजे, असे सांगळे यांनी सांगितले. 


अधिवेशनाचे प्रास्ताविक राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी करून, पत्रकार संघाच्या कार्याचा धावता आढावा घेतला. विविध क्षेत्रातील मान्यवर व संपादक, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही अधिवेशनास शुभेच्छा देऊन, आपण पत्रकारांमुळे खासदार झालो होतो, असा आवर्जुन उल्लेख केला. 


अधिवेशनास राज्य संपर्कप्रमुख संजय नवले, नगर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ मंडलिक,  अकोला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर तालुका प्रमुख अनिलशेठ चांडक, बाबासाहेब राशिनकर व सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व तालुकाध्यक्षांसह ग्रामीण पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या