आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा ‘प्रादेशिक वृत्त विभाग’ देशात सर्वोकृष्ट

औरंगाबाद :- आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची २०१३ च्या ‘सर्वोत्कृष्ट वृत विभाग’ ;k पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाचे महासंचालक श्री. मोहन चांडक यांनी एका पत्राद्वारे ही निवड झाल्याचे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राला कळविले आहे. देशभरातील ४८ प्रादेशिक वृत्त विभागातून ही निवड करण्यात आली आहे, असे औरंगाबाद आकाशवाणी कार्यालयाचे प्रादेशिक वृत्तविभाग प्रमुख रमेश जायभाये यांनी सांगितले.

       १ सप्टेंबर १९८० मध्ये आकाशवाणी औरंगाबाद केंद्रामध्ये सु्रू झालेला हा प्रादेशिक विभाग सुरूवातीला केवळ पाच मिनिटांचे मराठी बातमीपत्र आणि पाच मिनिटांचे उर्दू बातमीपत्र प्रसारित करीत असे. मात्र २००८ मध्ये देशभरातील बातमीपत्रांचे मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरण झाले. त्यामध्ये आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने आणखी तीन बातमीपत्रे सु्रू केली. या विस्तारीकरणानंतर आता दररोज पाच बातमीपत्रे आाकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहेत.

विस्तारीकरणापाठोपाठ २०१३ मध्ये या वृत्तविभागाने आपले अत्याधुनिकीकरण करून वृत्त विभागाला कार्पोरेट चेहरा मिळवून दिला. गेली ३३ वर्षे एका खोलीत चालणारा हा विभाग दुसऱ्या मजल्यावर एका सुसज्ज अशा वातानुकूलित हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आला. विभागातील सर्व संगणक, फर्निचर बदलण्यात आले असून पायाभूत सुविधांबरोबरच आकाशवाणीने देशभरात ४८ केंद्रामध्ये स्थापित केलेल्या नेटिया सॉफ्टवेअर प्रणालीचीही अंमलबजावणी केली आहे. या प्रणालीचा यशस्वीपणे वापर करणारा हा विभाग देशातील पहिला विभाग ठरला असून सध्या देशात फक्त एकमेव आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचाच प्रादेशिक वृत्त विभाग या प्रणालीच्या माध्यमातून बातम्याचं प्रसारण करीत आहे. या प्रणालीच्या वापरामुळे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे सर्व मराठी बातमीपत्र जवळपास कागदविरहित-  पेपरलेस बनले आहे. सर्व मराठी बातम्या दूरचित्रवाणीप्रमाणे प्रॉम्पटरवर वाचण्यात येतात. याचबरोबर प्रादेशिक बातम्यांची श्रवणव्याप्ती वाढविण्यासाठी आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी प्रसारीत होणारे बातमीपत्र मराठवाड्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत करण्याची व्यवस्थाही केली आहे. बातमीपत्रांमध्ये राज्यातील आकाशवाणीचे वार्ताहर निवेदकांप्रमाणे थेट बातमी सांगण्याची त्याचबरोबर विविध कार्यक्रमातील वक्त्यांचे भाषणही या नवीन प्रणालीत भ्रमणध्वनींवरून थेट वृत्तविभागाच्या कक्षात रेकॉर्ड करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये विविधता, रंजकता तसेच विश्वासार्हता निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.

औरंगाबादची मराठी आणि उर्दू अशा दोन्ही भाषेतील सर्व बातमीपत्रे लिखित आणि श्राव्य अशा दोन्ही प्रकारात दररोज इंटरनेटवरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आकाशवाणीच्या न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावर ही बातमीपत्रे उपलब्ध आहेत. आकाशवाणीच्या श्रोता संशोधन केंद्राच्यावतीने वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत प्रादेशिक बातम्यांना श्रोत्यांनी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. यापूर्वी या विभागातील  पुरूषोत्तम कोरडे यांना उत्कृष्ट वार्ताहरचा पुरस्कार मिळाला होता, त्यानंतर आता २० वर्षानंतर या विभागाला उत्कृष्ट विभाग म्हणून गौरविण्यात येत आहे.

सध्या बातमीपत्रांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून यात बातम्यांच्या भाषांतराबरोबरच बातम्यांची निवड आणि मराठवाड्यातील बातम्यांना विशेष प्राधान्य देण्यावर जोर दिला जात आहे.  समाजातील सर्व घटकांना सामोरे जावे लागणाऱ्या ज्वलंत समस्यांचे प्रतिबिंब बातमीपत्रात पडेल याची खबरदारी घेणे, अशा समस्यांचे निराकरण करणारे कार्यक्रम वेळोवेळी प्रसारित करणे, कृषी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसारित करणे इत्यादि बाबींचा यात समावेश आहे.

प्रादेशिक वृत्त विभागानं उचललेल्या अशा पावलांमुळं विभागाची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली. विकासविषयक घडामोडींची प्रासंगिकता समोर ठेऊन त्यावर आधारित ऑडिओ इन्सर्टचा वापर आपल्या बातमीपत्रांमध्ये व्हावा त्याचप्रमाणं विविध क्षेत्रातील लोकांचा त्यातील सहभाग वाढावा यासाठी या विभागानं खास प्रयत्न केले आहेत. समाजातल्या दुर्लक्षित आणि व्ंचित घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची योग्यप्रकारे जाणीव व्हावी यासाठी हा वृत्तविभाग अशा विविध विकासविषयक घडामोडींवर आधारित वृत्त आपल्या बातमीपत्रांमध्ये समाविष्ट करण्यासाठी सतत लक्ष केंद्रित करत असतो.

 गेल्या कित्येक पिढ्यांपासून जनमानसात रुजलेल्या खुळचट तर्कविसंगत, शास्त्रविसंगत आणि समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या कालबाह्य धारणा जाऊन समाजाच्या प्रत्येक घटकात विज्ञानाशी आणि तर्काशी सुसंगत ठरतील अशा धारणा रुजाव्यात यासाठी हा विभाग आपल्या प्रासंगिक आणि ध्वनिचित्र या कार्यक्रमांचा योग्य उपयोग करून घेतो.

हा वृत्त विभाग कालानुरूप अधिक सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी या विभागाशी निगडित यंत्रणा आतापर्यंतच्या उपलब्धीवर समाधान न मानता अधिक नेटानं आणि उत्साहानं पुढं जाण्यास कृतसंकल्प आहे. भविष्यातही या विभागाची वाटचाल अशीच उत्साहवर्धक सुरू राहावी, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असं वृत्त विभाग प्रमुख जायभाये यांनी सांगितले.