भाऊनीही काढले 'मी' म्हणणा-या संपादकांचे वाभाडे

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनीही,बंद पडलेल्या मी मराठी चॅनलच्या आणि सतत मी - मी म्हणणा-या संपादकांचे चांगेलच वाभाडे काढले आहेत.लंडनमधील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेली इमारत खरेदी करायला निघालेल्या मालकांकडे इतका पैसा कुठून आला,हे विचारणा करण्याऐवजी त्यांची स्तुती करण्यात हे महाशय गर्क झाले होते,आता मालक जेलमध्ये गेल्यावर अवघ्या तीन महिन्यांत हे चॅनल बंद पडले,मग इतका पैसा कुठे गेला,याचे उत्तर हे महाशय मालकांना विचारतील का ?
खरचं हा मालक ती इमारत विकत घेणार होता की संपादकांनी सोडलेली पुडी होती ? उत्तर उपेक्षित !

भाऊच्या ब्लॉगमधील अंशत: भाग - 

अनेकांना काहीही लिहीता येत नाही किंवा व्यासंगही नसतो. जाहिरातीच्या वा अन्य मार्गाने भांडवली कारभार भरभराटीला आणण्यासाठी त्यांचा उपयोग करून घेतला जातो. किंबहूना त्यासाठीच अन्य व्यवसायातील पैसा माध्यमात गुंतवला जातो. एका मराठी वर्तमानपत्र व वाहिनीचा मालक सध्या अफ़रातफ़रीच्या आरोपाखाली तुरूंगात जाऊन पडला आहे. त्यामुळे चार महिने तिथल्या पत्रकार संपादकांना पगारही मिळू शकलेला नाही. छापायचे काय आणि प्रक्षेपित काय करायचे, याची भ्रांत आहे. परंतु त्याच वाहिनीच्या संपादकांच्या काही महिन्यापुर्वीच्या गमजा कोणी आठवून बघाव्यात. लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वा़स्तव्य झालेली इमारत राज्य सरकारने विकत घेतली नाही तर ह्या वाहिनीच्या मालकाने विकत घेण्याची घोषणा केली होती. त्याचा गौरव करण्यात त्याचे संपादक गर्क होते. तेव्हा त्यांना आपल्या मालकाकडे इतका पैसा कुठून आला, असा साधा प्रश्न पडला नाही. आताही मालक गजाआड जाऊन पडला आहे, त्याविषयी अवाक्षर हे संपादक बोलणार नाहीत. ही आजकालच्या संपादक पत्रकारांची लायकी झाली आहे. पैशाला पासरी पत्रकार व संपादक विकत मिळतात. आपापल्या स्वातंत्र्याची द्रौपदी वस्त्रहरणाला सादर करण्यासाठी रांग लावून अनेक बुद्धीमान संपादक पत्रकार ताटकळत उभे आहेत. पुरेसे दु:शासन दुर्योधन पैसा ओतून बाजारात येत नाहीत, याचे अनेकांना दु:ख आहे. कारण आता वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे ही समाज प्रबोधनाचे साधन राहिलेल्या नाहीत. आपापले अजेंडे घेऊन लोकांच्या गळी मारणारी यंत्रणा म्हणून माध्यमे वापरली जातात. त्यासाठीचा येणारा अवाढव्य खर्च जो भागवणार, त्याचाच अखेरचा शब्द असेल ना? 

काय म्हणतात भाऊ ते त्यांच्या ब्लॉगवर वाचा....