वाचकाचे पत्र

मी एक सामान्य मराठी नागरिक आहे. आजचे मराठी पत्रकार स्वतःच स्वतःला खूप हुशार, सर्वज्ञानी, पीडितांबद्दल कमालीची कळकळ असलेले मानत असल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आल्याने हा मजकूर बेरक्याकडे पाठवण्याची इच्छा निर्माण झाली. या पत्रकारांच्या अशा वागण्यामुळेच मराठी पत्रकारितेला चांगले भविष्य नाही हे शब्द गेली काही वर्षे आमच्याही कानावर येत राहिले आहेत, असे आता वाटत आहे. त्याला हे कूपमंडूप पत्रकार आणि त्यांच्या माध्यमसमूहाचे नेतृत्वच आहे, असेही वाटू लागले आहे. अलीकडेच मराठी न्यूज चॅनेल्समध्ये आणखी एका चॅनेलची भर घालणाऱ्या आणि 'महाराष्ट्रात आपणच नंबर वन' असल्याचा आव आणत 'जग बदलायला' निघालेल्या चॅनेलची ही गोष्ट. नुकतीच त्यांच्या प्राईम टाईममध्ये त्यांनी एक सवाल उपस्थित करत एक चर्चा घडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अर्थातच इतर धडाडीच्या काही मराठी पत्रकारांप्रमाणे त्यांचाही आविर्भाव या भूतलावर आपणच सर्वज्ञानी आहोत असा होता. प्रत्यक्षात त्यांनाही गल्लीच्या बाहेर जग नाही. हे स्पष्टच आहे. यांचे जग म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिकेच्या बाहेर नाही. कधी तरी काही मुद्दे गांभीर्याने हाताळायचे असतात यावर त्यांचा विश्वासच नाही. असो. मराठी माणसाला तेच हवे असते, तमाम मराठी पत्रकारितेत असाच समज आहे.
नेहमीप्रमाणे पठाणकोट/पाकिस्तानचा विषय असल्याने त्या चर्चेतही त्यांना मान्यवर पाहुण्यांना बोलावून घेतले. मग परराष्ट्र संबंध आणि संरक्षणाशीसंबंधित विषय म्हटल्यावर त्यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पण त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी त्या विषयातील माहीतगारांना कमीतकमी बोलू दिले आणि इतरवेळी आक्रस्ताळेपणा सुरूच ठेवला.
ते लष्करी अधिकारी काही तथ्ये मांडू लागल्यावर त्या महोदयांनी लगेचच त्यांना तुम्ही भाजपचे, सरकाराचे समर्थक आहात असा शिक्का मारला. कारण सरकारी यंत्रणा कायम शिव्यांची लाखोली वाहण्यासाठीच आहे, हा इतर पत्रकारांप्रमाणे त्यांचाही ठाम समज. त्या चर्चेतील चूक लष्करी अधिकाऱ्यांनी लक्षात आणून देताच त्यांचा आक्रस्ताळेपणा आणखीनच वाढला. त्यांनी ओआरओपीवरून सर्व लष्करी अधिकारी-जवानांच्या देशभक्तीवर, प्रामाणिकतेवर, कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित केले. आमचे जवान सीमेवर दिवसरात्र जीवाची पर्वा न करत देशाचे संरक्षण करत असताना त्यांच्या प्रामाणिकपणावर, कर्तृत्वावर शंका घेण्याइतका नीच विचार असे आक्रस्ताळे, धडाडीचे पत्रकारच करू शकतात. या निष्ठावान पत्रकारांच्या इतक्या बेडूकउड्या तरी आमच्या लष्करात मारल्या जात नाहीत! आता हा प्रश्न उपस्थित करणे त्या चर्चेत अप्रस्तुत का नव्हते. पण हे पत्रकार कधीच चूकत नसतात. सगळे गुण यांच्याकडे आणि दोष मात्र समोरच्यांकडे आहेत. हे सर्वज्ञानी आहेत. प्रत्येक गोष्ट तिच्यातील गांभीर्य घालवून आक्रस्ताळेपणाने मांडत त्यातील सर्वाधिक ज्ञान आपल्यालाच कसे आहे, हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात स्वतःच्याच अक्षमता उघड्या पडत आहेत आणि स्वतःचेच प्रेक्षकांसमोर हसं करून घेत आहोत, हे त्यांच्या लक्षातही येत नाही. कारण ते सर्वज्ञानी, हुशार आहेत. तर मग इतका आक्रस्ताळेपणा का करावा लागतोय? प्रत्यक्षात त्या लष्करी अधिकाऱ्यांचे ज्ञान, जग अँकरपेक्षा बरेच व्यापक आहे, हे आम्हालाही माहीत आहे.
कधी तरी हे चॅनेल पाहायला गेलेलो आम्ही सामान्य नागरिक अखेर चॅनेल बदलण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. तसे हे चॅनेल प्रेक्षकांना काहीफारसे आवडलेले नाही हे उघडच आहे. हे आमच्याही लक्षात येतच आहे. पण ते स्वतःत काही बदल करणार नाहीत. कारण ते परफेक्ट आहेत.
दुसरा प्रसंग - बऱ्याच दिवसांनंतर मनात आले, म्हणून मी मराठी मनाचा मानबिंदू विकत घेण्यासाठी पेपर स्टॉलवर गेलो होतो. त्या पत्र नव्हे मित्रावरील जुन्या प्रेमाखातर तो विकत घेण्याची इच्छा झाली. त्यावेळी तो स्टॉलधारक ओळखीचा असल्यामुळे त्याने मला सांगितले की, हा मित्र १ मेपासून ५९९ रुपयांची एक नवी स्कीम आणत आहे. ते ऐकून मला आश्चर्यच वाटले. कारण पुण्यात या मित्राचे अगदी जोरदार आगमन होऊन आता पाच वर्षे झाली तरी एकेकाळचा हा ब्रँडेड पेपर अजूनही स्कीमवरच खपवावा लागत आहे. तेव्हा वाटले की, पुण्यात ही अवस्था आहे, तर बाकीच्या आवृत्त्यांचीही निश्चितच अशीच स्थिती असणार. असो.
काही वर्षांपूर्वी टाईम्स ग्रुपनेच पेपरमध्ये उथळपणा, बाजारूपणा, झगमगाट, रंगेलपणावर भर देत नव्या स्वरुपाच्या पत्रकारितेचा पाया रचला होता, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे क्रिकेट, सेलिब्रिटी, गल्लीबोळातील घडामोडी अशा मोजक्याच विषयांना त्यात स्थान मिळू लागले. सुरुवातीला हे नवे असल्यामुळे लोकांना चांगले वाटले. पण मग बाकीच्या पेपर, न्यूज चॅनेल्सनीही तथाकथित आधुनिकतेचा आव आणत हाच मार्ग अवलंबला. त्याचा परिणाम असा झाला की, सगळीकडे सारखेच कव्हरेज येऊ लागले. त्यामुळे सगळ्या पेपर किंवा न्यूज चॅनेलमध्ये एकसारखाच साचा आला. या सर्वांमध्ये ठराविक वाचकवर्गाशिवाय अन्य वाचकांना नक्की काय पाहिजे त्याचा विचारच झाला नाही. त्यामुळे वाचक या प्रकाराला कंटाळले आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, एकेकाळी सर्रास खपणाऱ्या मोठमोठ्या पेपरलाही अस्तित्वासाठी पत्रकारितेच्या बाहेरचे वेगवेगळे उपाय (इव्हेंट वगैरे) करावे लागत आहेत. यात पत्रकारितेचा मूळ उद्देश बाजूलाच पडला आहे. यात दुखणे कुठे आहे ते सामान्य नागरिकांनाही समजत आहे. पण ते सत्य स्वीकारायची कोणत्याही माध्यम समूहाची तयारी नाही.
आज मराठी, हिंदी माध्यमांमध्ये कोण सर्वांत जास्त उथळ बातम्या देतो याची स्पर्धा सुरू असते. त्यातून ते वाट्टेल ते दाखवत असतात. पण वास्तव असे आहे की, आज माध्यमात काम करणाऱ्या व्यक्तींपेक्षा सामान्य नागरिकांनाच जगाची जास्त माहिती असते हे स्पष्ट होत राहते. आजच्या पत्रकारांपेक्षा बहुतांश सामान्य नागरिकांचा दृष्टिकोन अधिक व्यापक असल्याचे दिसत आहे. जर तमाम मराठी पत्रकारांच्या दाव्यानुसार, ते खरंच जग जिंकायला/बदलायला निघालेत, तर त्यांचे जग इतके संकुचित का आहे? मी सामान्य नागरिक असूनही गेल्या एक-दोन महिन्यांमध्ये संरक्षणाच्या क्षेत्रात काही महत्त्वाच्या घटना दिसल्या. मग या धडाडीच्या पत्रकारांना त्या बातम्या द्याव्याशा का वाटल्या नाहीत. त्या बातम्यांचे महत्त्व समजून घेण्याची त्यांची क्षमता नसल्यामुळेच कदाचित त्या बातम्यांना वेगवेगळे निकष लावत तिकडे दुर्लक्षच केले असणार. त्यात त्यांना सनसनाटी, आक्रस्ताळेपणा करता येण्याजोगे, उथळ असे काहीच दिसले नसेल.
- एक वाचक