प्रशांत कांबळेच्या पत्रकारितेवर पोलिसांचा वरवंटा...

प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी या दोन पत्रकारांना अमरावती पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात फसवलं. पोलीस ठाण्यात त्यांचा छळ केला, दरोडेखोरासारखी, सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देत, त्यांना बेड्या घालून फिरवलं. प्रशांत कांबळे काही मामुली पत्रकार नव्हता, मुंबईसारख्या शहरात त्याने पत्रकारिता केली, उतृष्ट पत्रकारितेसाठी राज्य शासनाचा 1 लाख रुपयाचा पुरस्कार प्रशांतला मुख्यमंत्र्याच्या हातून मिळाला. नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या वार्तांकन त्याने दोनदा केलंय. एवढं सगळं सोडून प्रशांत आपल्या गृहजिल्ह्यात पत्रकारिता करायला गेला. त्याचा हाच मोठा गुन्हा झाला, कारण मुंबईत एखाद्या पत्रकारांना मारहाण झाली, शिवीगाळ जरी झाली तरी त्याची दखल घेतली जाते. सर्व पत्रकार एकत्र जमतात. शहरातील न्युज ग्लॅमर बघता सर्व पुढारी एकत्र येऊन निषेध करतात, कारवाईची मागणी करतात, सरकारदेखील तातडीने दखल घेत.
मात्र प्रशांत मुंबईत नव्हे तर चांदुर बाजार सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करत होता. (पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक बाहेरच्या बातम्यांना तशीही TRP च्या दृष्टीने किंमत नाही. कधी काळी नागपूरलाही नव्हती मात्र मुख्यमंत्री आणि महत्वाचे मंत्री विदर्भातील असल्यामुळे आता मीडियाच्या दृष्टीने नागपूरची किमंत वाढली आहे) प्रशांतला अटक झाली, तेव्हा अमरावतीत एक दोघांना सोडलं तर कुणालाच या घटनेचा पत्ता नव्हता. सोशल माध्यमावरून जेव्हा प्रशांत संदर्भातील बातम्या, लेख वायरल झाले, त्यावेळी राज्यात इतर पत्रकारांना प्रशांतच्या अटकेबद्दल कळलं, त्यानंतर सर्वत्र पत्रकारांनी आपल्या आपल्या परीने या घटनेचा निषेध केला. अगदी बुलढाण्यापासून ते बेळगाव पर्यंत निषेध नोंदवण्यात आला.. रुग्णालयात हातकड्या घालून उपचार घेत असलेल्या प्रशांतचे फोटो सर्वत्र वायरल झाले. मुख्यमंत्र्याकडून पुरस्कार घेतांनाचा प्रशांतचा फोटो , बेड्यामध्ये जकडलेला प्रशांत...या छायाचित्रानी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. स्थानिक वृत्तपत्रांनी प्रशांतची बाजू लावून धरली, निवेदनं दिली मात्र निष्ठूर पोलीस प्रशासन काही बधलं नाही.
अमरावती ग्रामिणचे पोलीस अधीक्षक आणि पत्रकारांनीच दिलेल्या तथाकथित सिंघमच बिरुद लाऊन फिरणारे अविनाश कुमार यांना अनेक जेष्ठ पत्रकार भेटले. त्यांना समजावून सांगाण्याचा प्रयत्न केला.मात्र अविनाश कुमार यांच्या डोक्यात एकचं विचार " म्हणे प्रशांत पत्रकारच नाही, तो कुठे काम करतो " अहो अविनाश कुमार मग प्रशांतला मिळालेला पुरस्कार, त्याने केलेलं जय महाराष्ट्र चॅनेलसाठीच काम हे सर्व खोट आहे? प्रशांतने काही महिन्यांपूर्वी जय महाराष्ट्र हे चॅनेल सोडलं, मात्र तो आता काही दिल्ली आणि मुंबईतल्या पब्लिकेशनसाठी काम करतो, फ्रिलांन्स पत्रकार म्हणून काही वृत्तवाहिन्यांसाठी बातम्या करतो. एवढं समजावून सांगूनही अविनाश कुमार समजून घेत नाही.खर तर दोन महिने अविनाश कुमार जर रजेवर गेले तर त्या कालावधीत ते पोलीस अधिकारी असणार नाहीत का? एवढ साध सोप उत्तर त्याच्या प्रश्नाचं आहे. मात्र ते कधीच मान्य करणार नाही ...कारण एकदा का ते मान्य केलं तर पोलिसांनी केलेल्या पाशवी त्याचारावर ,दडपशाहीवर दंडुकेशहिवर पांघरून घालणार कस ? त्यामुळे प्रशांत पत्रकार आहे हे मान्य करायचं नाही एवढी साधी सोपी स्ट्रेटीजी पोलिसांची आहे. कदाचित उद्या पोलीस प्रशांतचा मुखमंत्र्याच्या हातून घेतलेला पुरस्काराचा फोटोही बनावट आहे असही म्हणतील.
प्रशांतवरच्या पोलिसी अत्याचाराची कहाणी इथंच संपत नाही. तीन दिवस बेड्या ठोकून रुग्णालयात ठेवल्यानंतर ठेवल्यानंतर बुधवारी पोलिसांनी प्रशांतला कोर्टात हजर केलं. कोर्टानं प्रशांत आणि अभिजीतला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडीत आम्ही प्रशांतला मारहाण करणार नाही असा शब्द पोलिसांनी उपस्थित पत्रकारांना दिला मात्र तो पाळला नाही. गुरुवारी मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास तिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोरकर अचानक चांदुर बाजार पोलीस ठाण्यात आले आणि पोलीस कोठडीत शिरले..त्यांनी सीने स्टाईलने प्रशांतला मारहाण करण्यास सुरुवात केली. " मी बोरकर आहे, हा माझा बॅच बघ, तू पत्रकार आहेस ना , बघ तुझी गर्मीच उतरवतो, हिंमत असेल तर मला मारन दाखव" असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्याने प्रशांत आणि अभिजितला लाथा भुक्यांनी अमानुष मारहाण केली. प्रशांत गयावया करत होता मात्र जवळपास 50 मिनिटे प्रशांतला हि मारहाण सुरूच होती. नियमानुसार ज्या पोलीस ठाण्यात पोलीस कोठडी दिली जाते, त्या ठाण्याचा पोलीस चौकशी अधिकारी या संशयित आरोपींची चौकशी करू शकतात (तो देखील मारहाण करू शकत नाही) मात्र इथं अमरावती पोलिसांनी पत्रकारांना त्यांची औकात दाखवण्याचा अफझलखानी विडा उचलला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही दबाव टाका, मोर्चे काढा, निवेदन द्या. मात्र तुम्हाला जुमानत, मोजत नाही आम्ही कायदा वाटेल तसा वापरू..तुमचा मानवाधिकार गेला चुलीत असाच पवित्रा अमरावती पोलिसांनी घेतला आहे.
संबंध राज्याच लक्ष वेधून घेतलेल्या या सवेंदनशील प्रकरणात पोलीस एवढी मस्ती, दडपशाही करत असेल तर सामान्य माणसासोबत ते कशे वागत असतील याची कल्पना करवत नाही. मात्र एक प्रश्न पडतो " अमरावती पोलिसांमध्ये एवढी मस्ती आली कुठून ? आमदार, लोक प्रतिनिधी काय करताहेत? एरवी छोट्या मोठ्या गोष्टींना ट्विटर ने उत्तर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत हि बाब पोहोचलीच नाही का ? राज्यात ठेवलेले दोन गृह राज्यमंत्री करतात काय? मुख्यमंत्री कार्यालयाला अनेकांनी ट्विटरद्वारे या प्रकाराची माहिती दिली तरी सर्व थंडच..मुख्यमंत्री साहेब" एका हातून पुरस्कार दुसऱ्या हातून असले अत्याचार..तुमचं गृह खात करत असतील तर तुमचा तो पत्रकार सरंक्षण कायदा चुलखंडात टाका "
तुम्ही कितीही आक्रोश करा, आरडाओरडा करा..आम्ही प्रशांतची पत्रकारिता उध्वस्त केलीच आहे. आता आम्ही प्रशांतलाही उध्वस्त करू असं थेट आव्हान अमरावती पोलिसांनी आम्हा पत्रकारांना दिलय.सध्यातरी प्रशांत खचलाय, निराश झालाय..मात्र पराभूत झालेला नाही. आणि कुठल्याही परिस्थिती प्रशांतला आणि त्याच्या पत्रकारितेला आम्ही संपवू देणार नाही , पराभूत होऊ देणार नाही. अमरावती पोलिसांचं आव्हान आम्ही सर्वानी स्विकारलय..कारण आज प्रशांत आहे..उद्या आपल्यापैकी अजून कुणी दुसरा प्रशांत असेल...
(पत्रकार प्रशांत कांबळेेला , अभिजित तिवारी ला साथ द्या..कुठल्याही परिस्थिती त्याला पराभूत होऊ देऊ नका)

जाता जाता -
सुनील ढेपे, प्रशांत कांबळे नंतर आपलाही नंबर लागू शकतो, तेंव्हा पत्रकारानो एक व्हा ...आपणच आपल्या बांधवाच्या पायात पाय घालू नका...

> प्रशांत कांबळे याच्यावर धार्मिक भावना भडकवणे, जातीय तेढ निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
> प्रशांत कांबळेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, ही वेळ आपल्यावरही येवू शकते...
#सपोर्ट_प्रशांत_कांबळे