धमकावून पत्रकारांनी उकळले २३ हजार रुपये

मीरारोड - कथित पत्रकरांनी साथीदारांसह एका कथीत पत्रकारास तु बोगस असल्याचे धमकावुन २३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार मीरारोडच्या नयानगर मध्ये घडला आहे. पोलीसांनी तीघांना अटक केली असुन एकाचा शोध सुरु आहे.

एका युट्युब चॅनल मध्ये पत्रकारिता करत असलेला शैलेश गणपत पटेल (३५) रा. रॉयल कॉम्पलेक्स, जयभवानी लेन, मालाड हा नया नगर मध्ये राहणारया आपल्या सहकारी कर्मचा-याच्या घरी आला होता. त्यावेळी आयुब इब्राहिम शेख (४४) रा. सनराईज अपार्टमेंट, नया नगर
याने पटेल याला फोन करुन खाली बोलावले. पटेल खाली गेला असता त्याला अयुब याने आपण अधिकारी असून तुझे पत्रकारितेचे ओळखपत्र तपासायचे आहे असे सांगीतले. पटेलने ओळखपत्र दाखवले असता मुदत संपली असुन तो बोगस पत्रकार असल्याचे त्याला सांगत शम्स मस्जिद जवळील कार्यालयात नेले.

पटेल याने मदतीसाठी आपले परिचित पंकज विजय बेदी (३७) रा. राज एक्जोटिक्स, हाटकेश व राजेश ुहरिप्रसाद पांडे (३७) रा. लक्ष्मी नगर, मालाड या दोघा कथीत पत्रकारांना फोन करुन बोलावुन घेतले.
पंकज हा जनता समाचार युट्युब चॅनल व साप्ताहिकचा पत्रकार असल्याचे सांगतो. तर पांडे देखील असाच कथीत पत्रकार आहे.

बेदी व पांडे दोघे आल्यावर आयुब याने पटेल हा बोगस पत्रकार असुन कारवाई करायची नसेल तर एक लाख रुपयांची खंडणी मागीतली. अखेर २० हजार रुपयात मांडवली झाली. पांडे याने साळसुदपणाचा आव आणत मी माझी सोन्याची चैन, अंगठी गहाण ठेऊन पैसे आणुन देतो सांगीतले. व पांडेनेच २० हजार रुपये आणुन दिल्या नंतर पटेलची सुटका झाली. दुसरया दिवशी पटेल याने पांडेला २० हजार व ३ हजार व्याज मिळुन २३ हजार रुपये दिले.

परंतु त्याला अयुब, पांडे व बेदी यांचे संगनमत असल्याचा संशय आला. अअखेर नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. अयुब, पांडे व बेदी या तीघांना अटक केली असुन त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.

साभार - लोकमत