यांचं असं का होतं ?

पत्रकार विश्वातील काही महत्वाच्या क्षमतावान परंतु वर्तुळाबाहेर गेलेल्या काही गुणवान पत्रकारांच्या अवतरणांची वस्तुनिष्ठ आणि परखड कारण मीमांसा वाचा बेरक्यामधून 

*** दैनिक लोकपत्रचे रवींद्र तहकिक यांचे , साप्ताहिक सदर

**** यांचं असं का होतं  ? 
-------------------
*** प्रास्ताविक 

यांचं असं का होतं  ? 
----------------------------------
पत्रकारिता आणि पत्रकार,तत्व-मूल्य-स्पर्धा-संघर्ष-टिकण्याची धडपड आणि आणखी बरंच काही.म्हणजे ओंडक्याचा ठोकळा बनण्याची,भट्टीत धुपण्याची,पेटण्याची,जळण्याची,अंगार बनण्याची आणि मग पुन्हा उतरती कळा लागून अकाली कोळसा किंवा संपूर्ण जळत जात जाऊन राख बनण्याची प्रक्रिया. काही भाग्यवान यातून तरणारे,काही अभागी उकिरड्यावर फेकले जाणारे.किंवा खत म्हणून खपणारे.अशी कित्येक माणसे आहेत पत्रकार विश्वात.त्यांच्यावर बायोपिक निघणार नाही.कुणी पुस्तकही लिहिणार नाही.किंवा त्याच्या नावाने एखादे वाचनालय,व्याख्यानमाला,पुरस्कार वगैरे.गेला बाजार एखादे पुस्तक.फार कशाला आज स्थितीत कोणी स्वर्गवासी झाला तर त्याच्यावर दुसऱ्यादिवशी लेख-अग्रलेख सुद्धा लिहून येतील की नाही अशी शंका वाटते.काय आहे,मराठी पत्रकारितेत 'मामाचं पत्र हरवलं'सारखा खेळ सुरु झालाय.सगळे गोल बसलेले.ज्याच्यावर राज तो पोटात टोपी घेऊन एखाद्याचा  पाठी टोपी टाकून देतो.तो बेसावध राहिला की राज बदलतं,कधी टोपी घालणाऱ्याचाही डाव हुकतो.थोडक्यात सगळे आपल्या 'कण्या'खाली असणाऱ्या अगतिक माकडहाडाने सुरक्षित (?) असणाऱ्या पार्श्वभागाच्या संवेदना जाग्या ठेवून खेळात सहभागी असतो.मागे टोपी पडल्याचं कळायला पाहिजे ना ! आजही चांगले पत्रकार आहेत,नाही असे नाही.परंतु पत्रकार किंवा संपादक म्हणून आपण मंडळी समाजात,वाचकात,आणि ज्या विषयावर आपण आपली ८० टक्के शक्ती खर्च करतो त्या राजकारणात आपल्याला खरेच पाहिजे ती प्रतिष्ठा आहे ? ,दरारा आणि जरब आहे ? जे बंडखोरी करतात ते बाहेर फेकले जातात.बाकीचे चक्रव्यूहात फिरत राहतात.'राज' बदलत ! मामाचं पत्र हरवलं,तेच मला सापडलं' काय चाललंय हे ? खरेच आम्हाला जांभेकर,टिळक,आगरकर,शि. म. परांजपे, आचार्य अत्रे,निळकंठ खाडिलकर.अनंतराव भालेराव,बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे? जुने राहुद्यात निदान गोविंदराव तळवलकर,माधव गडकरी,विद्याधर गोखले ,अरुण टिकेकर,भोपटकर,अरुण साधू,ग. वा. बेहेरे,या मालिकेत लिहिता येतील अशी नावे या पुढे कुठे शोधायची ? याचा अर्थ चांगले लिहिणाऱ्यांचा,शोधणाऱ्यांचा,अभ्यासू आणि भूमीकावादी पत्रकारितेचा दुष्काळ पडलाय असे नाही.पिकतं भरपूर पण विकत नाही.मुळात जे पिकतं ते विकत नाही.किंवा पिकतं तिथं विकत नाही.मग जे विकतं ते पिकवलं जातं.मालक मंडळींनाही तेच हवं असतं.त्यात पत्रकारितेतील किलिंग पॉलिटिक्स.नोकरीवर येणारा सन्मानाने येत नाही,असताना सुखाने राहत नाही आणि जातानाही सन्मानाने जात नाही.किंबहुना जाऊ दिला जात नाही.महाभारत आहे.महाभारत.कोण कोणाच्या बाजूने लढतंय, कोण कोणासाठी काय व्यूहरचना करतंय,कोण कोणाला मारतंय,काहीच कळत नाही.युद्धाला काही निकषच नाही तर निष्कर्ष काय आणि अनुमान काय ? यात चांगलं वंगाळ सगळ्यांचीच राख होते.ओलं सुद्धा आणि सुकं देखील.गव्हा बरोबर किडे सुद्धा.उगाचच ! यांचं असं का होतं कळत नाही ....
-----------------------------
भाग: एक 
--------------------
अमर्याद निखिल वागळे
------------------------------
वाचा : सोमवार ,दिनांक १२ नोव्हेंबर २०१८