बेरक्या इतका शांत कसा ?

मराठी मीडियातील बित्तंबातमी देणारा बेरक्या हा एकमेव ब्लॉग ... गेल्या आठ वर्षांपासून बिनधास्तपणे सुरू आहे. पण हल्ली हा ब्लॉग दररोज अपडेट होत नाही, अशी वाचकांची प्रेमळ तक्रार ... बेरक्या इतका शांत कसा? त्याच्यावर दबाव आला की काय ? अशीही काही लोकांच्या मनात शंका.

पण वस्तुस्थिती अशी आहे की , कोणाच्या विरोधात उठसुठ बातमी देणे हे बेरक्याचे काम नाही. फालतू बातम्या देणे बेरक्याने कटाक्षाने टाळले आहे. बेरक्याला रोज मेल येतात,९० टक्के मेल हे  वैयक्तिक मतभेद, तिरस्कार, स्पर्धा यातून पाठवलेले असतात. मात्र अश्या मेलला बेरक्या दाद देत नाही. एखादी न्यूज खरी असली तरी त्याची ३ वेळा क्रॉस चेक केली जाते. सत्यता पटल्यानंतर मग ती बातमी प्रसिद्ध केली जाते. कोणत्याही लुंग्यासुंग्या पत्रकाराविरुद्ध बेरक्यावर बातमी प्रसिद्ध होत नाही. किमान त्याला त्या तालुक्यात तरी प्रतिष्ठा हवी.

मराठी मीडियात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर बेरक्याचे लक्ष असते. जेव्हा लक्षवेधी बातमी असते तेव्हा नक्कीच बातमी दिली जाते. पण जेव्हा घडामोडी नसतात तेव्हा बेरक्या शांत असतो. एखादा शिकारी सावज टप्यात आल्यावर जसा शिकार करतो, तसे  बेरक्या बातमी हातात लागल्यावर त्याची खात्री करून बातमी देतो.

जेव्हा मराठी मीडियात विशेष उल्लेखनीय घटना , घडामोड नसते तेव्हा ओढून ताणून बातमी दिली जात नाही. अश्या वेळी ब्लॉग अपडेट होत नाही. मग बेरक्या शांत कसा अशी चर्चा सुरु होते. बेरक्या शांत कधीच नसतो, फक्त तो बातमीची वाट पाहात बसलेला असतो.

तेव्हा बेरक्या शांत कसा ? याचे उत्तर आपणास मिळाले असेलच. तेव्हा बेरक्या ब्लॉग वाचत राहा. बेरक्याचा अँप डाऊनलोड करा. जे अँप डाऊनलोड करतात त्यांना बातमी प्रसिद्ध झाल्यावर आपोआप नोटिफिकेन्स येते.

तूर्तास इतकेच. पुन्हा भेटू. नवीन बातमी घेवून ...

बेरक्या उर्फ नारद