प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार

नवी दिल्ली : प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांना प्रतिष्ठेचा 'रॅमन मॅगसेसे 2019' हा पुस्कार जाहीर झाला आहे. तळागाळातील वंचितांसाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर‌ केल्याबद्दल‌ रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार‌ जाहीर झाला आहे.‌ फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे या पुरस्काराचे 9 सप्टेंबरला वितरण होईल. आज (ता. 2) या पुरस्काराच्या नावांची घोषणा झाली.   

रवीश कुमार हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळणाऱ्या पाच मान्यवरांपैकी एक असतील. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीची चेहरा समजले जाणारे रवीश कुमार 'इंडियाज् प्राईम टाईम शो' प्रवाभीपणे चालवतात. यामुळेच त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे रॅमन मॅगसेसे फाऊंडेशनने सांगितले आहे. 'सत्यासाठी उभे राहणे, नैतिक पत्रकारिता, नैतिक धैर्य, तथ्यावर आधारित पत्रकारिता, वंचितांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सरकासमोर मांडणे या विशेष कारणांसाठी त्याला मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे,' असे फाऊंडेशनने सांगितले. 

रवीश कुमार यांच्यासह म्यानमारमधील पत्रकार को स्वी विन, थाई हक्कांसाठी काम करणारे अगाखान निलापैजीत, दक्षिण कोरियातील समाजसेवक किम जाँग की आणि फिलिपीनमधील संगीतकार रेमुंडो पुंजाते केब्याब यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
1975 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारास सुरवात झाली. लोकशाहीत जनहितार्थ आणि निरपेक्ष काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान कण्यात येतो.  व्यक्तीला पुरस्काराने शोभा येते पण एखाद्या व्यक्तीमुळे त्या पुरस्काराला शोभा येते,’ असे व्यक्तीमत्व म्हणजे #रवीशकुमार.

लोकशाही ज्या चार स्तंभांवर उभी आहे त्यापैकीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमे आज कमकुवत होताना दिसतोय. कारण लोक कागदावर छापून येणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेवून दोन-पाच रुपये खर्चून दररोज लोक वर्तमानपत्र वाचतात, ‘इंडियन इडियट बॉक्स’ अर्थात टिव्हीवर शिव्या देत का होईना पण हिंदी, इंग्लिश आणि मराठी न्यूजचॅनेल्स अजुनतरी  पाहत आहेत. दररोज रात्री सात वाजल्यानंतर काही चॅनल्सवर विविध पक्षाचे प्रवक्ते, राजकीय विश्लेषक, सिनेअभिनेते, अभिनेत्री, मानसोपचार तज्ज्ञ यांना घेऊन स्वतः सूत्रसंचालकाच्या भुमिकेत बसून (उन्हाळ्यात सुद्धा ब्लेझर,टाय घालून) ‘दशमुखी रावण’ अशी फ्रेम तयार करून जे अपेक्षित चर्चानाट्य घडविले जाते. आपल्या मालकाच्या भुमिकेला (हितसंबंधांना) पूरक अशाच गोष्टी ऐकून घेत, चर्चेतील अन्य पाहुण्यांची एकमेकांमध्ये भांडणे लावत, सत्य बोलणाऱ्याचा अपमान करत, विरोधी मत मांडणाऱ्यांचा आवाज ‘म्यूट’ करत, सत्ताधाऱ्यांच्या प्रचारकी टिमक्या वाजवित, अखेर चर्चेचा ४५ मिनीटांचा वेळ संपला की विजयी झालेल्या अभिनिवेशामध्ये जे तथाकथित पुरूष आणि महिला पत्रकार (?), केबीनकॉक संपादक (केवळ वातानुकुलीत केबीनच्या त्या खुर्चीवर बसले म्हणून संपादक झालेले) (अर्थात काही सन्माननीय वगळता) या चर्चांना रोज लोक सहन करत आहेत. एकांगी चर्चा आणि आरडाओरडा सहन न झाल्यावर हळूच रिमोटचे बटन दाबून मनोरंजनासाठी दुसऱ्या चॅनेलवर शिफ्ट होत आहेत.

केंद्र किंवा राज्यातील सरकार अडचणीत येणारी देशात एखादी मोठी घटना होणार असेल तर लोकांचे त्यावरून लक्ष दुसरीकडे हटविण्यासाठी प्रचारकी सुपाऱ्या घेऊन सनसनाटी, तिखट मीठ लावून, घशांच्या शिरा ताणून, प्रसंगी धावत, मोठ्या देशभक्ताच्या आवेशात घडविल्या जाणाऱ्या चर्चा, बातम्या वारंवार टिव्हीच्या आणि मोबाईलच्या स्कीन्सवर आदळली जात आहेत. यामाध्यमातून सत्तेतील पक्ष त्यांचा अजेंडा रेटत आहेत. संभ्रम निर्माण करून वैचारीक गोंधळातील जनमत तयार करत आहेत. तर सर्व चॅनेल मात्र जणू काही देशातील सर्वात मोठी ‘ब्रेकिंग (कि बार्किंग) न्यूज’ आमचीच, या आठवड्यात आम्हीच नंबर वन, असा आकड्यांचा खेळ खेळला जातोय. लोक अजुनतरी त्यांचा सयंम राखत दररोजचा सावळा गोंधळ ऐकून झोपायला जात आहेत.

एकीकडे काही भांडवलशाहीचे पुरस्कर्ते मालक संपादकांकरवी आर्थिक फायद्यासाठी, लाभांची पदे, राज्यसभा खासदारकी पदरात पाडून घेण्यासाठी, मालकांसह स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी मेकअप करून बसलेल्या संपादक, निमंत्रित, पूर्वनियोजित यजमानांचा रोज गोंधळ सुरू आहे.तर दुसरीकडे एक आशेचा किरण म्हणजे एनडीटिव्ही. त्यावरच्या निष्पःक्ष, विचार करायला लावणाऱ्या बातम्या, विश्लेषण, शांत आणि सयंमी खेळकर वातावरणामध्ये खरेखुरे तज्ज्ञ, विश्लेषक आणि अभ्यासू प्रवक्त्यांसोबत घेतल्या जाणाऱ्या चर्चा आणि रवीश कुमार.