'दिव्य मराठी'ने तोडले अकलेचे तारे ...

वृत्तपत्रे नगरपालिका, महानगरपालिका यांचे पैसे वाचवू शकतात का? कुणी एखाद्या वार्ताहराने असा दावा केला तर कुणी विश्वास ठेवेल का? मुळीच नाही; उलट अशा वार्ताहराला वेड्यात काढले जाईल. त्याचे डोके फिरलेय म्हणून इतर रिपोर्टर त्याला टाळू लागतील. पण असा चमत्कार झालाय खरा. गुणवत्ता, वेगळेपणाच्या गप्पा हाणणारया 'दिव्या मराठी'ने असा 'न भूतो न भविष्यति' चमत्कार धुळ्यात घडवून आणला.
दिव्य मराठीने वाचवले मनपाचे 30 लाख रुपये

ही बातमी जरूर वाचा... ही बातमी वाचून हसावे की रडावे हे वाचकांना कळले नाही; तुम्हालाही कळणार नाही.. मात्र माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्याकडून छोटा संगणक पटकावणारा आणि एका गुन्ह्यात आरोपी असलेला लफडेबाज वार्ताहरच कानामागून आला आणि तिखट झाला. त्याच्या स्वत:च्या कॉपीमुळे जळगावात ब्युरो चीफ हैराण झाले आहेत. आणि हे महाशय मराठवाड्यातील वार्ताहरांना पत्रकारिता शिकवायला पाठविले गेले. अरे बाबा तू काय शिकविणार आम्हा मराठवाड्यातील मंडळींना.... घाम गाळून, बारा गावाचे पाणी पिवून तयार झालोत आम्ही... रात्री दहा वाजता गोधडीत गुंडाळून घेवून झोपत नाही आम्ही..

या महाशयांनी तोडलेले आणखी काही अकलेचे तारे पाहा...
पांझरेतील कचरा गोळा करून विद्यार्थी सेनेने केली होळी
 सेनेचा पाठपुरावा - ‘दिव्य मराठी’ च्या अभियानातून पांझरा प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
म्हणे एका वृत्तापात्रामुळे दोन कोटी तरतूद झाली. अभियान चांगले आहे, त्याबद्दल शंकाच नाही. त्याबद्दल 'दिव्य मराठी'चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांचे अभिनंदन! निसर्ग, पर्यावरण, वन्यजीवन याबद्दल त्यांना मोठी आस्था आहे. मध्यप्रदेशात ते अनेक सरकारी कमिट्यावर आहेत. त्यांच्या शब्दाला सरकारदरबारी मोठे वजन आहे. जिथे 'भास्कर'चे प्रचंड प्राबल्य वर्षानुवर्षे आहे; त्या मध्यप्रदेशात कधी असा चमत्कार घडलेला नाही. मग तो धुळ्यात कसा घडला. वाचकांना अक्षरश: वेड्यात काढले गेले. वृत्तपत्रे सांगतील आणि तरतुदी होतील तर मग स्थानिक स्वराज्य संस्था हव्यातच कशाला? 'दिव्य मराठी'च्या वार्ताहरानाच जागोजागी पालिका ध्यक्ष, महापौर, आयुक्त करूयात की.. म्हणजे भ्रष्टाचारालाही सुट्टी! नाही म्हणायला उत्तरेत ट्रीप काढायला, मौजमस्ती करायला रोहिदास दाजी वैगेरेकडून वर्षाला एखादवेळी 'बक्षिसी' घेतली तर हरकत नाही. (दिवाळीत नाही का दारोदारी फिरून पोस्टमन वसुली करतो)

कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी सांगतील असे काम होते का? तरतुदी अंदाजपत्रकात महिने-दोन महिने आधीच केल्या गेलेल्या असतात. सेटिंग मधून एखादा पदाधिकारी देतो कोट. त्याच्या काय बापाचे जाते. पेपरमुळे केली दोन कोटींची तरतूद सांगायला. संपादकांना शेंडी लावू शकतात असे वार्ताहर पण वाचकांना वेड्यात नाही काढू शकत. पर्यायाने होते काय? वृत्तपत्राचे हसू!! धुळ्यात 'दिव्य मराठी'ने किती वाचविलेत? दोन कोटी 30 लाख!! शाब्बास रे भाऊ...