दासगुप्ता 'लोकमत'मध्ये आले अन् भरभरून बोलले
शफी पठाण ■ नागपूर
घरच्या अठराविश्व दारिद्रय़ामुळे कचरा वेचून पोट भरणार्या रवींद्र दासगुप्ता या ज्येष्ठ पत्रकाराला वेडा ठरविण्याचा निंदनीय प्रकार काही मंडळींनी सुरू केला आहे. हलाखीचे जीवन जगणार्या दासगुप्तांना आर्थिक मदत व्हावी, या भावनेतून 'लोकमत'ने पुढाकार घेतल्यानंतर काही कारण नसताना ही मंडळी दासगुप्तांना वेडा ठरवायचा प्रयत्न करीत आहेत. ते घरचे श्रीमंत असून त्यांना मदतीची गरज नाही, असेही यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर दासगुप्ता यांना आज बुधवारी दुपारी 'लोकमत' कार्यालयात आमंत्रित केले. यावेळी त्यांनी 'लोकमत'च्या संपादकीय विभागातील कर्मचार्यांसोबत विविध विषयांवर तब्बल दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. परंतु या प्रदीर्घ चर्चेत कुठेही कुणाबद्दल तक्रार केली नाही किंवा कुणाला शिव्याही दिल्या नाहीत. अस्खलित इंग्रजीत बोलणारे, जुन्या आठवणी तारीख व संदर्भासह सांगणारे व पत्रकारितेचे अनेक तांत्रिक पदर उलगडून दाखविणारे दासगुप्ता वेडे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या चर्चेदरम्यान दासगुप्ता यांनी जे सांगितले ते खरेच मोलाचे होते. दासगुप्ता म्हणाले, माझी आज जी परिस्थिती झाली आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुणाबाबतही राग वा द्वेष नाही. १९८0 साली मी पत्रकारितेत आलो तेव्हा माझा पगार अडीचशे रुपये होता. १९९६ ला जेव्हा आमचे दैनिक बंद पडले तेव्हा मला साडेआठशे रुपये मिळायचे. परंतु दैनिक बंद पडल्यानंतर तो आधारही हिरावला. सहा बहिणी आहेत यातील पाच वेगवेगळया शहरात राहतात. नागपुरात जी बहीण आहे तिच्या आधारानेच मी राहात आहे. परंतु तिचीही आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही. आर्थिक आधार मी गमावला आहे. परंतु किमान मानसिक आधार तरी कायम असावा म्हणून मी रोज सायंकाळी रामकृष्ण मठात जातो व तेथे ध्यान करतो. जुने दिवस आठवतात तेव्हा डोळ्यात अश्रू उभे राहतात असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.
स्मरणशक्ती शाबूत, संदर्भही मुखपाठ
या संपूर्ण चर्चेदरम्यान दासगुप्ता यांनी पत्रकारितेच्या काळातील अनेक आठवणी सांगितल्या. त्या सांगताना ते अचूक तारीख व नेमका संदर्भही सांगायचे. कित्येक पत्रकारांची नावे तर त्यांना त्यांच्या वडिलांच्या व आडनावासह मुखपाठ होती. पत्रकारितेपासून सुमारे १८ वर्षांपासून अलिप्त असतानाही त्यांना या आठवणी व संदर्भ मुखपाठ असतील तर दासगुप्तांना मानसिक आजार आहे, असा अपप्रचार करणारी ही मंडळी कुठल्या आधारावर असे सांगताहेत हेही स्पष्ट व्हायला हवे.
पत्रकार दासगुप्ता मनाचे श्रीमंत : समाजाच्या आधाराची गरज
|