श्रावण
महिन्यात अन्नदान केल्याने म्हणे पुण्य लाभते. हे पुण्य मिळविण्यासाठी अनेक
जण उदार होतात. त्यातल्या त्यात बाबूजी पडले अतिउदार... त्यांनीही
अन्नदानाचे हे पुण्य मिळविण्यासाठी म्हणे, श्रावण शनिवारी भद्रा मारुतीच्या
दर्शनासाठी खुलताबादकडे पायी जाणा-या भाविकांना फराळाचे वाटप केले...(त्याची बातमी लोकमतमध्ये शनिवारच्या ६ ऑगस्टच्या अंकात प्रसिध्द झाली आहे.) पण
बाबुजींनी काही चांगले केलेले न बघवणा-या मंडळींच्या डोळ्यांत हे खुपले
असावे. कारण त्यांच्याच पेपरात म्हणे, अशा प्रकारे अन्नदान करणा-यावर
यथेच्छ टीका करण्यात आली... पेपर बाबुजींचा अन् टोमणाही बाबूजींना... हे
बघून वाचकांचे डोळे भलेही फिरले असतील, पण शेवटी लोकमत किती निर्भिड अन्
निपक्षही आहे, याचेही दर्शन घडले ना! मालक चुकला म्हणून काय झाले, त्यालाही
दरडावयला हवे की नको!!
रविवारच्या, सात ऑगस्टच्या अंकात पान २
वर 'वावर' या सदरात गजानन दिवाण यांनी श्रावण महिन्यात अन्नदान करणा-या तमाम
मंडळींना (अर्थात बाबुजींनाही) झोडपले. पोट भरलेल्यांना खाऊ घालण्यात कसले
आले पुण्य, असा सवाल त्यांना केला... (हा सवाल पाहून नंतर हा लेख
छापल्याबद्दल बाबुजींनी संपादकाला काय काय सवाल केले असतील देव जाणे.)
एवढ्यावरच न थांबता दिवाण नावाच्या या महाशयांनी अन्नदान करणाèयांची आर्थिक
मिजासखोरीही काढली (त्यात बाबुजी आलेच.) सध्या पैसा भरपूर आहे, पण तो
काहीच लोकांकडे आहे, पण त्यांनाही समाधान नाही. मग अन्नदानातून अशा
वेगवेगळ्या मार्गाने समाधान शोधण्याचा प्रयत्न केला जातो, असेही सांगायला
दिवाण यांनी कमी केले नाही. हा सर्व लेख वाचल्यानंतर बाबुजींनी आशू दर्डा
यांच्यासह जाऊन जे अन्नदान केले, ते पुण्यासाठी नव्हे तर समाधानासाठी केले,
असे जणू या लेखकाला सूचवायचे असावे. अन्नदानाच्या चुकीच्या (!)
कृत्याबद्दल ज्या निर्भिडपणे लोकमतच्या संपादकांनी मालकाचे कान टोचले याला
तोड नाही. (अर्थात बाबुजींच्या ही बाब लक्षात आली असेल तर संपादकांचा ते
नक्कीच या निर्भिडपणाबद्दल सत्कार करतीलच, नाही का?) दिवाण यांचा लेख
वाचून बाबुजींना निश्चितच काहीतरी चुकीचे केल्याची जाणीव होईल आणि ते
केलेल्या अन्नदानाबद्दल पुन्हा लोकमतमध्ये जाहीर दिलगिरीही व्यक्त करतील,
असे वाचकांना
वाटल्याशिवाय राहिले नाही. एवढे मात्र खरे की, हा
सारा प्रकार संपादकांची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करणारा ठरला आहे,
मालकाच्याच कृत्याला अशा प्रकारे त्यांच्याच वृत्तपत्रात चुकीचे ठरवणारा
संपादक जगाच्या पाठीवर पहिलाच असावा. दिवाण यांचा लेख चांगला असला तरी,
त्याचा टोन योग्य पद्धतीने घेतला असता, एकवेळ दूर्लक्षित केले गेले असते,
पण साराच प्रकार जणू बाबुजीशी असलेली खुन्नस काढण्यासाठीच असावा, असा संशय
येतो...(!)