पत्रकारांनी समाजातील चुकीच्या बाजूंवर प्रहार करावा -फडणवीस

मुंबई-   पत्रकारांनी समाजातील चुकीच्या बाजूंवर प्रहार करत त्यात दुरुस्ती करण्याचे काम केले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.

 मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार दै. पुण्यनगरीच्या मुख्य संपादक श्रीमती राही भिडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर उपस्थित होते.

 आचार्य अत्रे यांच्याविषयी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, अत्रे यांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे कोणत्याही गोष्टीत त्यांचे स्वत:चे मत असायचे. एखाद्या विषयावर ठामपणे,नीडरपणे मत मांडण्याचे काम करणारी माणसेच समाजामध्ये परिवर्तन करु शकतात. आचार्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात चालवली. 

मुख्यमंत्री म्हणाले, राही भिडे यादेखील पत्रकारितेमध्ये बेधडकपणे काम करतात.  त्यांनी नेहमीच सामान्य माणसाचा आवाज आपल्या लेखनीने ताकदीने शासनापर्यंत, समाजापर्यंत नेण्याचे काम केले. त्यांनी ज्या- ज्या ठिकाणी काम केले तेथे ठसा उमटवण्याचे काम केले. आज पत्रकारितेच्या क्षेत्रात बदल होत आहे. या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आज बातमीदारी गतिमान झाली आहे. पत्रकारितेतून समाजाचे प्रतिबिंब तयार झाले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

  राही भिडे यांनी आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, सर्व सामान्यांची बाजू घेऊन लेखनी चालवल्यास पत्रकारिता फुलत जाते. आपल्या राज्यात सर्वसामान्य माणसाला नेहमीच पत्रकारांचा आधार वाटत आला आहे. शासनावर अंकुश ठेवण्याचे कामही पत्रकारितेने केले आहे. पत्रकारितेत आता बदल होत आहेत. चिंतनशील, वैचारिक पत्रकारिता आता राहिली नाही अशी खंत व्यक्त करुन श्रीमती भिडे म्हणाल्या, सेकंदा सेकंदाला अपडेट्स देणारी इन्स्टन्ट पत्रकारिता असे आज पत्रकारितेचे स्वरुप झाले आहे. स्वरुप बदलले तरी सर्वच घटकांनी समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले पाहिजे.

   पत्रकारिता प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त झालेला विद्यार्थी तन्मय प्रमोद शिंदे यास ज्येष्ठ पत्रकार दिनकर साक्रीकर पारितोषिक (दिनू रणदिवे यांच्या देणगीतून) आणि ज्येष्ठ पत्रकार मनोहर देवधर पारितोषिक (मनोहर देवधर यांच्या पत्नी सुलभा मनोहर देवधर यांच्या देणगीतून) वेब जर्नालिझम परीक्षेत‍ द्वितीय श्रेणी प्राप्त झालेली विद्यार्थिनी कविता नागवेकर यांना प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच पत्रकार संघाच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

   संघाचे अध्यक्ष श्री. वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यवाह श्री. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. श्री. वाबळे आणि श्री. चव्हाण यांचाही माधव रानडे यांच्या देणगीतून सत्कार करण्यात आला.