भाजप नेता म्हणतो पत्रकार सेक्सलाही होतात तयार

चेन्नईः महिला पत्रकार काम मिळवायचे असेल तर सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. प्रसार माध्यमांमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहचू शकत नाहीत. एवढेच काय त्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय वृत्तनिवेदकही होऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचा नेता एस. व्ही. शेखर यांनी फेसबुकवर लिहिली होती. मात्र, मोठ्या प्रमाणात गदारोळ माजल्यानंतर फेसबुकवरून ही पोस्ट डिलीट करण्यात आली.
एस. व्ही. शेखर यांनी फेसबुकवर 'मदुराइ युनिव्हर्सिटी, गव्हर्नर अँड द व्हर्जिन चिक्स ऑफ ए गर्ल' या शिर्षकाखाली पोस्ट लिहिली होती. पोस्टमध्ये महिला पत्रकारांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरचे भाष्य केले होते. 'तामिळनाडूतील प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे लोक तुच्छ, हीन आणि नीच दर्जाचे आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच काही चांगली माणसे आहेत. त्यांचा मी आदर करतो. एवढेच नाही तर तामिळनाडूतील प्रसारमाध्यमे फक्त ब्लॅकमेलिंग करणाऱ्या आरोपींच्या हातात आहे. महिला पत्रकार काम मिळवायचे असेल तर सेक्स करण्यासही अगदी सहज तयार होतात. प्रसार माध्यमांमधील कोणत्याही मोठ्या पदावरच्या व्यक्तीसोबत सेक्स केल्याशिवाय महिला पत्रकार मोठ्या पदावर पोहचू शकत नाहीत. एवढेच काय त्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय वृत्तनिवेदकही होऊ शकत नाहीत.'
दरम्यान, शेखर यांच्या पोस्टवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ माजला आहे. शेखर यांचा निषेध करण्यासाठी महिला पत्रकार भाजपा मुख्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. तामिळनाडूच्या पत्रकारांनी शेखर यांच्याविरोधात तक्रारही केली आहे. नेटिझन्सनी शेखर यांना ट्रोल करत त्यांच्यावर टीकेचे ताशेरेही ओढले आहेत. मात्र, प्रकरण अंगलट आल्यानंतर शेखर यांनी मला तसे म्हणायचे नव्हते म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टचे क्रेडिट शेखर यांनी थिरुमलइ एस नावाच्या व्यक्तीला दिले असून, थिरुमलाइ हे अमेरिकेतील भाजपाचे समर्थक आहेत असे त्यांनी सांगितले आहे. थिरुमलाइ यांची पोस्ट मी शेअर केली त्याआधी वाचली नाही, असेही ते आता म्हणू लागले आहेत. मात्र, हे सगळे प्रकरण त्यांच्यावरच शेकले आहे.
महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रह्मण्यम हिच्या गालाला विनासंमती स्पर्श केल्याने तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच अडचणीत सापडले होते. यानंतर पुरोहित यांनी लेखी माफीनामाही मागितला होता. लक्ष्मी सुब्रह्मण्यमला लिहिलेल्या माफीनाम्यात राज्यपालांनी म्हटले आहे, की ती मला नातीसारखी असून, तिच्या पत्रकारितेचे कौतुक म्हणून आपुलकीच्या नात्याने तिच्या गालाला स्पर्श केला. या घटनेने तू दुखावली गेली, हे तुझ्याकडून समजले. याबद्दल मी माफी मागतो. तुझ्या भावना दुखावल्या गेल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, हे प्रकरण शांत होते ना होते तोपर्यंत भाजपचे शेखर यांनी नवा वाद ओढून घेतला आहे.

साभार - दैनिक सकाळ