वृत्तवाहिन्या, ई-पोर्टल्सचा धिंगाणा कोरोनापेक्षा भयंकर...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने काल मंगळवारपासून (दि. १७ मार्च २०२०) `मुंबईत आठवडाभर रेल्वे, बसेस आणि मेट्रो बंद राहणार आणि सात दिवस शासकीय कार्यालये बंद` अशी ब्रेकिंग न्यूज मराठी वृत्तवाहिन्यांवर सुरू झाली. वृत्तवाहिन्या व ई-पोर्टल्सच्या या खोडसाळपणा आणि उतावीळपणामुळे नागरिकांचा मात्र पुरता गोंधळ उडाला.


     सर्वात पुढे आम्हीच, नंबर वन आम्हीच अशी शेखी मिरवणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी जेव्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रेल्वे, बसेस व मेट्रो बंद होणार नाहीत, शासकीय कार्यालये बंद होणार नाहीत, असे स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत दिल्यानंतर डांगोरा पिटणाऱ्या वृत्तवाहिन्या अक्षरशः तोंडावर सपाटून आपटल्या. फेक न्यूज देणाऱ्या या वृत्तवाहिन्यांमध्ये एबीपी माझा सर्वात आघाडीवर होते. त्यानंतर न्यूज १८ लोकमत व अन्य वृत्तवाहिन्या व ई-पोर्टल्स आघाडीवर होते. खोट्या बातम्या व अफवा पसरविणाऱ्या या वृत्तवाहिन्या व ई-पोर्टल्सवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

     मुख्यमंत्री कुणाचा होणार ?  ही बातमी प्रसारित करताना सपाटून खालेल्या या दर्जाहीन चॅनेल्सनी काल अक्षरशः धुमाकूळ घातला. राजकारण्यांच्या बातम्या तशा फार गांभीर्याने लोकंही घेत नाहीत. विशेषतः या सगळ्या ऐकीव बातम्या कार्यालयात बसून `पॅकेज` पत्रकारितेच्या माध्यमातून `मॅनेज` झालेल्या असतात. मात्र, कोरोनामुळे अगोदरच `पॅनिक` झालेली लोकं या न्यूज चॅनेलवाल्यांच्या फेक बातम्यांमुळे हैराण झाले आहेत. चॅनेलवाल्यांनो, जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा...अशी म्हणायची आता वेळ आली आहे.



     कॅबिनेटची बैठक होण्याच्या अगोदरच `ब्रेकिंग न्यूज`ची पुडी सोडणाऱ्या `एबीपी माझा` च्या रश्मी पुराणिकला एवढी का घाई झाली होती? तिचे अनुकरण करून बाकीच्या टिनपाट ई-पोर्टल्सवाल्यांनीही तिचीच री ओढली. धडाधड ब्रेकिंग न्यूज सुरू केल्या. `न्यूजचा राजा` म्हणणाऱ्या चॅनेलने खोटी बातमी प्रसारित केल्याबद्दल किमान माफी किंवा दिलगिरीही व्यक्त केली नाही. मात्र, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या व्टिटर हॅंडलवर आलेल्या बातमीबद्दल दस्तुरखुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागून व्टिटर अकाऊंट हॅंडल करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली.

राजकारणी माणूस चुकला की, त्यावर चॅनेल्सवाले व इतर मीडिया हात धुऊन मागे लागतात. त्याला माफी मागायला भाग पाडतात. मात्र, जेव्हा स्वतःची चूक होते, तेव्हा चॅनेल्सवाले गप्प का? माफी का मागत नाहीत? राजकारणी म्हणजे गुन्हेगार ही वृत्ती आपण आता बदलायला हवी. राजकारणी चुकला की, मीडिया न्यायाधीशांच्या भूमिकेत जातो. आपण चुकतो तेव्हा किमान माफीची माफक अपेक्षा प्रेक्षकांनी का करू नये? याचा विचार आपण केला पाहिजे. नाहीतर मीडियाची विश्वासार्हता किती शिल्लक राहिली आहे, हे आपण सर्वजण चांगलेच जाणतो आहोत.

     विशेष म्हणजे `न्यूज १८ लोकमत`ने तर हुशारीच केली आहे. स्वतः प्रथम बातमी दिली आहे. शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर होण्याची शक्यता, बसेस, ट्रेन, मेट्रो बंद होणार...आणि नंतर सोशल मीडियाची अफवा अशी उलटी बातमी दिली. म्हणजे `चोर तो चोर वरून शिरचोर...` अशी अवस्था आहे. विशेष म्हणजे फेसबुकवर अकाउंटवर त्यांनी ही बातमी दिली. त्याला वाचकांनीही तशाच `हटके` प्रतिक्रिया दिल्या आहेत.

`सकाळ`चे विशेष प्रतिनिधी संजय मिस्कीन यांनीही चॅनेलवाल्यांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. अत्यंत बेजबाबदार टीव्ही चॅनेल्स, टी. व्ही. मीडियावाल्यांच्या तोंडाला केवळ मास्क नव्हे तर यांच्या मुसक्या आवळायला हव्यात. जगात इतर देशातला टीव्ही मीडिया कशा पध्दतीने कोरोनाचं `कव्हरेज` करत आहे, याचे प्रशिक्षण या चॅनेलवाल्यांना देण्याची नितांत गरज असल्याचे म्हटले आहे.

     पत्रकार हेमंत जोशी यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर `एबीपी गाढव माझा` असे शीर्षक देऊन ठोकून काढले आहे. मुंबई, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे लोक अस्वस्थ आहे. त्यात या असल्या फेक मीडियामुळे लोक अधिकच पॅनिक झाले आहेत. लोकांचे मनोबल खचण्यास सर्वाधिक कारणीभूत मराठी बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या आहेत. चोवीस तास कोरोनाविषयीच्या निगेटिव्ह बातम्या `स्प्रेड` केल्या जात आहेत, अशा सडकछाप टुक्कार बातम्या देणे योग्य नाही, असे म्हटले आहे.

     सात दिवसांची शासकीय सुट्टी जाहीर, ट्रेन, मेट्रो, बसेस बंद होणार, अशा खोट्या बातम्या पेरणाऱ्या न्यूज चॅनेलवरच्या प्रतिनिधींची व संबंधितांची कायमची सुट्टी करा, अशी मागणी होत आहे. खातरजमा न करता कोरोनाचे चुकीचे वृत्त दिल्याप्रकरणी सिंधुदुर्गात तीन वृत्तवाहिन्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याअगोदर या मोठ्या न्यूजचॅनेलवाल्यांच्या मुसक्या कोण आवळणार? हा प्रश्न आहे.


जाता-जाता :  एकीकडे कोरोनाविषयी चुकीच्या बातम्या देणारे पत्रकार असताना दुसरीकडे मात्र, `आपलं महानगर`चे पत्रकार किरण कारंडे यांनी सकारात्मक पत्रकारिता कायम ठेवली आहे. `शाब्बास! मुंबईकरांनी स्वतःलाच केले क्वॉरनटाइन` अशी धैर्य देणारी बातमी देऊन वास्तव व आश्वासक पत्रकारिता जिवंत ठेवली आहे. बेरक्याकडून पत्रकार किरण कारंडे यांचे अभिनंदन..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या