कचकच कांदा कापताना बोटं...


द्रौपदीच जर भर सभेत 'पाव्हणं जेवलात का ?' म्हणून कौरवांना इच्च्यरित असेल तर भीमाने काय कचकच कांदा कापायचा ?अर्जुनाने सुरीतून बोटं वाचवायची ? धर्मराजाने घासलेट टाकून चूल पेटवायची ? आणि नकुल-सहदेवांनी कढई तापवायची ? 

---------------------------------------------

बावनकुळे यांनी केले ते जर पत्रकारितेचे म्हणजेच पत्रकारांचे वस्रहरण असते तर आम्ही आमच्या लेखणीच्या गदेने त्या छप्पन्नाटिकलीच्या बावनकुळेंचे छाताड फोडून त्या रक्ताने चौथास्तंभ धुतला असता.पण हाय..त्याने केले ते वस्रहरण नाहीच.चीर हरण आहे ! इथे कृष्णानेच वस्र पळवलीत.त्यामुळे या दुष्कर प्रसंगात कोणी वस्र पुरवठा करून पत्रकारांची इज्जत झाकील असे घडणे नाही.पुन्हा आम्ही आमच्या लेखणीच्या गदेने छाती कोणाची,कशी आणि का म्हणून फोडायची ? द्रौपदीच जर भर सभेत 'पाव्हणं जेवलात का ?' म्हणून कौरवांना इच्च्यरित असेल तर भीमाने काय कचकच कांदा कापायचा ?अर्जुनाने सुरीतून बोटं वाचवायची ? धर्मराजाने घासलेट टाकून चूल पेटवायची ? आणि नकुल-सहदेवांनी कढई तापवायची ? हमाम में सब नंगे हे ठीक हो,पण रस्त्यावर ...हद्द झाली राव नागडेपणाची सुद्धा ! 


महाभारत कथेत वस्रहरणाचे दोन प्रसंग आहेत.एक दुःशासनाने कौरवांच्या सभेत द्रौपदीचे केलेले आणि दुसरे कृष्णाने गोकुळात गोपिकांचे केलेले.दुःशासनाने केले ती विटंबना ; म्हणून ते पाप.तर कृष्णाने केले ते आत्मदर्शन ; म्हणून ते पुण्यकर्म ! त्यामुळे कृष्णाने केलेल्या कृत्याला वस्रहरण न म्हणता चीर हरण म्हटले जाते.याच नियमाने परवा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर मध्ये पत्रकारांच्या बाबतीत जे केले ते वस्रहरण नसून चीर हरण आहे.अर्थात विटंबना नाही तर आत्मदर्शन ! बावनकुळेंनी महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांना 'थांब टकल्या भांग पाडतो' असे म्हणत आरसा दाखवला आहे.बावनकुळे जे म्हणाले त्यात खोटे काय आहे ? किती मराठी पत्रकार कोणाचे चहापाणी सुद्धा न घेता किंवा सुपारीचे खांड सुद्धा न खाता पत्रकारितेचा धर्म निभावतात ? विशेषतः राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते,पदाधिकारी.आमदार-खासदार,मंत्री,नगरसेवक,विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांच्याशी पत्रकारांचे काय आणि कसे संबंध असतात ? बातम्या कशा दिल्या,लावल्या आणि चालवल्या जातात ? दाबल्या किंवा एक्स्पोज केल्या जातात ? त्यासाठी काय,कुठे आणि कसे व्यवहार होतात.हे लपून राहिले आहे का ? 


बावनकुळे काय म्हणाले ?  ; पत्रकारांना चहापाणी पाजा,चिरीमिरी देत चला,ढाब्यांवर नेऊन खाऊपिऊ घालत जा.पाकिटे द्या.पॅकेज द्या.जाहिराती द्या.थोडक्यात विकत घ्या आणि खिशात टाका ! काय खोटे आणि चूक बोलले ? पत्रकार राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या पत्रकार परिषदांना जातात तेव्हा काय स्वतःचे डबे घेऊन जातात ? तिथे जाऊन चायबिस्कुट,रिफ्रेशमेंट,लंच-डिनर घेतातच की.भेटी स्वीकारतात.एखादा रसिक नेता लीकरपार्टीही देतो.अनेक पत्रकार राजकीय मंडळी सोबत ढाब्यांवर किंवा बारमध्ये जाऊन स्पेशल पार्ट्याही झोडतात.यात सरकारी अधिकारी-कर्मचारी,सामाजिक संघटनांचे म्होरके,पोलीस,इतकेच नाही तर गुंड,मवाली,गुन्हेगार,गुटखेवाले,मटकेवाले,पत्त्यांचे क्लब चालवणारे,अवैध दारूचे धंदेवाले,सरकारी कंत्राटदार-ठेकेदार,दलाल देखील असतात.या सगळ्यांना सांभाळून घेण्यासाठी पत्रकार आपला धर्म खुंटीला टांगत नाहीत का ? शंभरातले ८०-९० टक्के पत्रकार यात लडबडलेले आहेत.मेनस्ट्रीम प्रिंट-इलेट्रॉनिक मीडियातल्या एका विशिष्ट पक्षाचे गुलाम बनलेल्या 'गोदी मीडिया'बद्दल तर बोलायलाच नको.ते थेट विकले गेलेले आहेत.पण ही डीलिंग मालक आणि संपादक इथपर्यंत असते.बावनकुळेंनी त्याखाली हात घातला आहे.म्हणजे स्थानिक आणि जिल्हा-तालुका तसेच ग्रामीण पत्रकारापर्यंत.बावनकुळे जरा उघड आणि जाहीर बोलले.पण ते जे बोलले ते आधीपासूनच चालू आहे.त्यावर जरा अधिक जोर द्या.एवढाच बावनकुळेंच्या म्हणण्याचा मतलब आणि मतितार्थ.त्यावर पत्रकार मंडळी तुटून पडलीत.का तर अर्थात वस्रहरण झाले म्हणून.पण हे वस्रहरण नाही तर चीर हरण आहे.


पत्रकारच जर गोकुळातल्या गोपिकांप्रमाणे स्वतःची वस्रे वाळवंटात टाकून यमुनाजळीं खेळ खेळत असतील तर छप्पन्न टिकलीचा बावनकुळे ती वस्रे पळवून,कदंब वृक्षावर पावा वाजवीत बसणारच.बहुतेक पत्रकारांचे कसे आहे ; मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली ! नाका पर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर.लोकशाहीचा चौथास्तंभ,निस्पृह,निरपेक्ष,निर्भीड आणि परखड पत्रकारिता,तत्व आणि मूल्य या गोष्टी पत्रकारितेतून केव्हाच कालबाह्य झाल्यात.वर्षातून एकदा पत्रकारदिनी त्याचे घट बसवायचे आणि …

👆रवींद्र तहकीक

7888030472

Post a Comment

0 Comments