मुंबई – मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकाच्या प्रकरणावर कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी दंडुकेशाही गाजवत मारहाण केली. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये प्रचंड संताप उसळला असून, मंत्रालय परिसरात निषेधाचा भडका उडालाय!
टीव्ही मीडियाचे अध्यक्ष उदय जाधव यांनी या घटनेविषयी सोशल मीडियावर आवाज उठवताच पत्रकारांचा गट मंत्रालयात जमला. या निषेध सभेचे थेट फेसबुक लाईव्ह दैनिक लोकमतच्या पेजवर सुरू झाले. पण इथेच नाट्यमय वळण आले! पत्रकारांना पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा असताना, नेटिझन्सने त्यांच्यावरच धावून जात जोरदार धुलाई केली.
नेटिझन्सचा हल्लाबोल:
लाईव्ह दरम्यान, नेटिझन्सनी पत्रकारांवर अक्षरशः कमेंट बॉम्बिंग करत त्यांना चांगलंच धुवून काढलं. "चाय-बिस्किट कुत्रकार" ते "दलाल", "हात-पाय तोडायला पाहिजे होते" असे कमेंटसचा पाऊस पडला. काहींनी तर सरळ पत्रकारांना "भावपूर्ण श्रद्धांजली" अर्पण केली. इतकंच नव्हे, लोकमतने हा व्हिडीओ शेवटी हटवून टाकला!
पत्रकारांवर दादागिरी, पण लोक का संतापले?
पोलिसांची दादागिरी नक्कीच निषेधार्ह आहे, पण नेटिझन्स पत्रकारांवर एवढे का तुटून पडले? लोकांचा आक्रोश पाहता, पत्रकारांच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. चहापाणी घेत, दलाली करत लोकांच्या प्रश्नांवर झाक घालणाऱ्यांनी जर आता अन्यायाची भाषा केली, तर जनतेचा राग ओसंडून वाहणारच ना!
बरं, आता पत्रकारांनी आंदोलन करायला हवं ते पोलिसांच्या विरोधात की नेटिझन्सच्या?
सोशल मीडियावर प्रतिक्रिया रंगल्या
धक्काबुक्की कसली? पोलिस कर्तव्यावर असताना…
कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी जर परिस्थिती हाताळली असेल, तर त्यात दादागिरी कशी? उडी मारणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी पोलिसांवर असताना, पत्रकारांनी बाईटसाठी त्यांना अडवणे योग्य आहे का? कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांची कारवाई झुंडशाहीच्या दबावाखाली अयोग्य ठरवणार का? आणि जर निषेधच करायचा असेल, तर गृहमंत्र्यांचा करायला हवा, ना की त्यांच्या प्याद्यांचा! पोलिस हुकुमाचे ताबेदार आहेत, पण त्यांना आदेश देणारा गृहमंत्रीच जबाबदार नाही का?
माणुसकी विरुद्ध सनसनाटी पत्रकारिता?
संबंधित पीडित व्यक्तीला तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी पोलिसांची धडपड अयोग्य ठरते का? पत्रकारांनी त्या प्रसंगी संवेदनशीलतेचा अभाव दाखवत केवळ बाईट घेण्याच्या उद्देशाने पोलिसांना त्रास दिला, असे म्हणता येईल का? पत्रकारांनीही तारतम्य आणि भान ठेवायला नको का? पत्रकारितेच्या तत्त्वांचा आणि माणुसकीचा समतोल राखायला हवा, की केवळ सनसनाटीच्या मागे लागायचे? पत्रकारांनी आदर नेमका कुणाचा करावा? सत्याचा की सनसनाटीचा?
0 टिप्पण्या