उदय तानपाठक यांची 'पुण्यनगरी'च्या मुख्य राजकीय संपादकपदी नियुक्ती


मुंबई: ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि 'पुढारी' वृत्तपत्राचे माजी वरिष्ठ मंत्रालय प्रतिनिधी  उदय राजाराम तानपाठक यांनी नुकतीच 'पुण्यनगरी' वृत्तपत्राच्या मुख्य राजकीय संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे 'पुण्यनगरी'च्या राजकीय वृत्त विभागाला नवा आयाम मिळण्याची अपेक्षा आहे.

मूळचे त्र्यंबकेश्वर येथील असलेले श्री. तानपाठक १९८२ पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. सुरुवातीला 'सकाळ', 'नवशक्ती', 'मुंबई तरुण भारत' यांसारख्या प्रतिष्ठित दैनिकांमध्ये डोंबिवली प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 'मुंबई तरुण भारत'च्या सांज आवृत्तीत वार्ताहर-उपसंपादक म्हणून सहा वर्षे जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 'सामना' आणि 'चित्रलेखा'मध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. 'चित्रलेखा'मधील त्यांच्या 'ऑन दी स्पॉट रिपोर्टिंग'ने विशेष लक्ष वेधले होते, ज्यात मराठवाड्यातील कोचिंग क्लासेस घोटाळ्यावरील "शिक्षणाचा राडा - मराठवाडा" ही वृत्तमालिका विशेष गाजली.

१९९१ मध्ये श्री. तानपाठक 'पुढारी'मध्ये रुजू झाले आणि तब्बल ३४ वर्षे त्यांनी तिथे सेवा बजावली. संपादक प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. 'पुढारी'मध्ये असताना त्यांनी किल्लारी व भूज भूकंप, कारसेवा-रथयात्रा, बाबरी मशीद पाडकाम यांसारख्या महत्त्वाच्या घटनांचे प्रत्यक्ष जागेवरून केलेले वार्तांकन ('स्पॉट रिपोर्टिंग') खूप चर्चेत राहिले. अनेक राजकीय बातम्यांचे 'ब्रेकिंग' करण्याचे श्रेयही त्यांना जाते. त्यांची अभ्यासपूर्ण राजकीय वार्तापत्रे राजकीय वर्तुळात आवर्जून वाचली जातात. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.

'पुढारी'मधील प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीनंतर आता श्री. तानपाठक यांनी 'पुण्यनगरी' समूहातील या महत्त्वपूर्ण पदाचे आव्हान स्वीकारले आहे. 'पुण्यनगरी' हे महाराष्ट्रातील एक आघाडीचे दैनिक म्हणून ओळखले जाते, विशेषतः राज्याच्या ग्रामीण भागात या वृत्तपत्राचे वितरण जाळे मोठे आहे. सर्वाधिक छपाई केंद्रे आणि मजबूत वितरण प्रणाली ही 'पुण्यनगरी'ची बलस्थाने आहेत.

 उदय तानपाठक यांचे या नवीन जबाबदारीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या